फोडाफोडीच्या राजकारणाला वेग
By Admin | Updated: April 16, 2016 01:48 IST2016-04-16T01:08:32+5:302016-04-16T01:48:27+5:30
औरंगाबाद : सातारा- देवळाई या दोन्ही वॉर्डांतील पालिकेच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शुक्रवारी संपला आहे. १५ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराची सांगता

फोडाफोडीच्या राजकारणाला वेग
औरंगाबाद : सातारा- देवळाई या दोन्ही वॉर्डांतील पालिकेच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शुक्रवारी संपला आहे. १५ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराची सांगता धुमशान-तुफान अशी झाली. एकमेकांच्या विरोधात कुरघोडी करणारा प्रचार करीत गल्लोगल्ली रणधुमाळी सुरू होती. १७ एप्रिल रोजी दोन्ही वॉर्डांसाठी मतदान होणार असून, देवळाईत चौरंगी लढत होत आहेत, तर साताऱ्यात तिरंगी लढत होणार आहे. साताऱ्याच्या तुलनेत देवळाईमध्ये धनशक्तीच्या जोराचा जास्त वापर होणार असल्याची चर्चा आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला दोन्ही वॉर्डांमध्ये वेग आला आहे.
देवळाईमध्ये शिवसेनेचे हरिभाऊ हिवाळे आणि काँग्रेसचे राजेंद्र नरवडे यांच्यातच खरी लढत होणार असल्याची एक चर्चा आहे, तर दुसरीकडे भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत होईल असाही दावा करण्यात येत आहे. काँग्रेसने दिखाऊ प्रचार न करता पूर्ण अंतर्गत प्रचारयंत्रणा राबविली आहे. नरवडे, अप्पासाहेब हिवाळे हे मुळात शिवसेनेचेच आहेत; परंतु अप्पासाहेब हे आता भाजपमध्ये, तर नरवडे हे काँग्रेसमधून आपले भाग्य अजमावत आहेत. त्यामुळे शिवसेनाविरुद्ध शिवसेना असाही प्रचार देवळाईमध्ये पाहावयास मिळाला.
सेनेचे हरिभाऊ हिवाळे यांनी बहुमताने विजयी होणार असल्याचा दावा केला, तर भाजपच्या गोटातूनही विजयी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे नरवडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाजडही विजयी होणार असल्याचे ठामपणे सांगत आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी देवळाईत शिवसेनेसह सर्व उमेदवारांनी पूर्ण वॉर्ड पिंजून काढला.
साताऱ्यामध्ये शिवसेनेच्या पल्लवी गायकवाड, काँगे्रसच्या सायली जमादार आणि भाजपच्या सुरेखा बावस्कर यांच्यात लढत होत आहे. शिवसेनेने पदयात्रा काढून तो वॉर्ड पिंजून काढला. गायकवाड यांनी विजयी होणार असल्याचा दावा केला. जमादार आणि बावस्कर यांनीही विजयाचा दावा केला. शिवसेनेकडून पालकमंत्री रामदास कदम, संपर्कनेते विनोद घोसाळकर, खा. चंद्रकांत खैरे, भाजपचे किशनचंद तनवाणी, काँग्रेसचे आ. सुभाष झांबड, फिरोज पटेल यांनी दोन्ही वॉर्डांमध्ये ताकद पणाला लावली आहे.