पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
By Admin | Updated: July 24, 2014 00:24 IST2014-07-23T23:47:07+5:302014-07-24T00:24:22+5:30
मानवत : तालुक्यात पाऊस न पडल्यामुळे अनेक गावातील खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे.

पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
मानवत : तालुक्यात पाऊस न पडल्यामुळे अनेक गावातील खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे.
सर्वसाधारणपणे दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात खरिपाच्या पेरण्या पूर्ण होतात. परंतु, यंदा पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या. तालुक्यातील कुंभारी, थार, वांगी, हमदापूर, वझूर खुर्द व बु. या गावात अद्यापही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने खरिपाच्या पेरण्या खोळबंल्या आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांना कोणते पीक घ्यावे हे कळेनासे झाले आहे. पेरणीला उशीर झाल्याने या काळात येणारे एकमात्र पीक म्हणजे बाजरी होय. परंतु या पिकाला आपल्या भागात मागणी नसल्याने त्याला भावही येत नाही.
शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेवर बाजारातून कापूस, तूर, मूग, सोयाबीन आदी बियाणे व खते खरेदी करून आणून ठेवले आहे. परंतु पेरणी योग्य पाऊसच नसल्याने ही बियाणे घरातच पडून आहेत. त्यामुळे बी बियाणांचा आर्थिक भार शेतकऱ्यांवर अतिरिक्त पडणार आहे. २२ जुलैच्या रात्री झालेला रिमझिम पाऊस पेरणीसाठी उपयुक्त आहे. पावसाने जर आणखी काही काळ दडी मारली तर शेतकऱ्यांच्या हातून खरिपाचा हंगाम पूर्णपणे हातून जाण्याची शक्यता आहे, असे झाले तर शेतकऱ्यांच्या आर्थिक विंवचनेमध्ये आणखी भर पडणार आहे. दोन दिवसांपासून तालुक्यात रिपरिप पाऊस पडत आहे़ काही शेतकरी अल्पश: पावसावर खरिपाची पेरणी करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़
परंतु, काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली़ बियाणे उगवले नाही़ यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे़ निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे़ शेतकरी आजघडीला देशोधडीला लागला आहे़ (वार्ताहर)