पिकली पानेच ठरताहेत सॉफ्ट टार्गेट
By Admin | Updated: May 27, 2014 01:01 IST2014-05-27T00:50:10+5:302014-05-27T01:01:44+5:30
नांदेड : खुनासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे तर त्याचबरोबर सोनसाखळी, लुबाडणे आदी घटनांमध्ये ज्येष्ठ नागरीकांनाच अधिक लक्ष केले जात असल्याचे उघडकीस आले आहे़

पिकली पानेच ठरताहेत सॉफ्ट टार्गेट
नांदेड : खुनासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे तर त्याचबरोबर सोनसाखळी, लुबाडणे आदी घटनांमध्ये ज्येष्ठ नागरीकांनाच अधिक लक्ष केले जात असल्याचे उघडकीस आले आहे़ क्राईम रेकार्डस ब्युरोने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २००७ पासून महाराष्ट्रात १ हजार ६७९ ज्येष्ठ नागरिकांचे खून झाले आहेत़ नांदेडातही अशा खुनाच्या घटना घडल्या आहेत़ कधी एकटे राहत असल्याचे पाहून त्यांचे घर लुटले जाते़ तर कधी रस्त्यावर अडवून पोलिस असल्याचे भासवून त्यांना लुबाडले जाते़ स्थावर मालमत्तेच्या प्रकरणात तर नात्यातीलच व्यक्ती या हतबल वृद्धांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवित असल्याचे अनेक उदाहरणे पहावयास मिळाली़ नांदेडात तर असे प्रकार सर्रासपणे पहावयास मिळतात़ सकाळी किंवा सायंकाळी फिरायला बाहेर पडलेल्या या पिकल्या पानांना भामटे अतिशय अलगदपणे टार्गेट करतात़ मुलाबाळांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी आयुष्यभर झटणार्या या पिकल्या पानांना आता उरलेल्या आयुष्यातही हिंसक संघर्षाचा सामना करावा लागत आहे़ अशा गुन्ह्याच्या प्रमाणात महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात १४० टक्कयांनी वाढ झाली आहे़ याबाबत पोलिस दलाकडून वृद्धांसाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे़ परंतु महिला हिंसाचार याबरोबरच वृद्धांसाठी असलेली हेल्पलाईन नावालाच असल्याचे स्पष्ट झाले आहे़ त्यामुळे याबाबतीत तातडीने पाऊले उचलण्याची गरज आहे़ आर्थिक फसवणुकीत ज्येष्ठांचाच बळी आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये ज्येष्ठांचाच सर्वाधिक समावेश असल्याची बाब समोर आली आहे़ रिझर्व्ह बँक आणि सेबीने खोट्या मोहाला, आमिषांना बळी पडू नका असा सावधानतेचा इशारा दिला होता़ मात्र तरीदेखील बोगस कंपन्यामध्ये पैसे गुंतविणे सुरुच आहे़ हे सर्व भामटे उच्चशिक्षित असून भोळ्याभाबड्या ज्येष्ठांनाच जाळ्यात ओढतात़ घर का भेदीच जास्त धोकादायक मुले बाहेरगावी किंवा परदेशी असल्याने घरामध्ये एकटेच राहणार्या ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता हे मोठेच आव्हान आहे़ ज्येष्ठ महिला कौटुंबिक छळापासून साखळी चोरांचे लक्ष्य ठरत आहेत़ विशेष म्हणजे नात्यातील व्यक्ती ज्येष्ठ नागरीकांच्या छळास कारणीभूत ठरत आहेत़ कायदा काय सांगतो? फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १२५ कलमान्वये पालकांचा सांभाळ व निर्वाहासाठी लागणार्या पैशांची पूर्तता करण्याची जबाबदारी मुलगा आणि मुलगी या दोघांवर असते़ हा निर्वाहभत्ता न दिल्यास दंड आणि कारावासाची शिक्षा संबंधितांना होवू शकते़ त्याचबरोबर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी किंवा कौटुंबिक न्यायालयातही ज्येष्ठ नागरिक फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १२५ कलमान्वये अर्ज करु शकतात़ सुशिक्षितांचा गुन्हेगारी फॉर्म्युला गेल्या काही वर्षांत आणि इंटरनेटच्या प्रसारामुळे लोकांना फसवायचे नवेच तंत्र गुन्हेगारांना मिळाले आहे़ परिणामी सायबर गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे़ सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी परिमाणकारक यंत्रणाही नाही़ त्यामुळे इंटरनेटद्वारे फसविणार्यांची संख्या वाढतच आहे़ लोकांना अधिक नफा, व्याजाचे आमिष दाखविणार्या खोट्या कंपन्या काढल्या गेल्या़ पद्धतशीरपणे त्याचे दिवाळे काढून गुंतवणुकदारांना बुडवून हे भामटे पसार होतात़