ग्रामपंचायतीत कारभारी होण्यासाठी सहा हजार महिलांची उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:07 IST2021-01-08T04:07:46+5:302021-01-08T04:07:46+5:30
दुसऱ्या दिवशीही विलंब : सरपंच पदासाठी निवडणुकीनंतर आरक्षण सोडत असल्याने उमेदवार वाढले औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी ५ ...

ग्रामपंचायतीत कारभारी होण्यासाठी सहा हजार महिलांची उमेदवारी
दुसऱ्या दिवशीही विलंब : सरपंच पदासाठी निवडणुकीनंतर आरक्षण सोडत असल्याने उमेदवार वाढले
औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी ५ जानेवारीपासून खऱ्या अर्थाने सुरू झाली. उमेदवारी मागे घेणे, निवडणूक प्रचार चिन्ह मिळाल्यानंतर सर्व पॅनेल आणि उमेदवारांनी दणकावून प्रचाराला लागण्याचे नियोजन केले आहे. सरपंच पदासाठी निवडणुकीनंतर आरक्षण सोडत असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायतींत सुमारे सहा हजार महिला उमेदवार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
४ जानेवारी रोजी रात्री उशिरापर्यंत निवडणूक चिन्ह मिळण्यावरून इच्छुक उमेदवार आणि पॅनेलमध्ये रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांनी रिंगणात आणि माघार घेतलेल्या उमेदवारांची गोळाबेरीज करताना दमछाक झाली. ५ जानेवारी रोजी सायंकाळपर्यंत आकड्यांची जुळवाजुळव सुरू होती.
किती ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या, याची माहिती
निवडणूक होऊ घातलेल्या ग्रामपंचायती किती
६१७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत.
एकूण प्रभाग
२०९० प्रभाग पूर्ण ग्रामपंचायतींमध्ये
रिंगणात उमेदवार किती
निवडणुक रिंगणात ११ हजार ४९९ उमेदवार आहेत.
मतदान केंद्रांची संख्या
जिल्ह्यात २ हजार ४७ मतदान केंद्र आहेत.
५ हजार ५४८ उमेदवारांची माघार
जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींच्या २ हजार ९० प्रभागांतील ५ हजार ६८३ सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतून तब्बल १६ हजार ९५७ जणांनी अर्ज दाखल केले होते. ५ हजार ५४८ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. वैजापूर तालुक्यात १६३०, सिल्लोडमध्ये १५०९, कन्नड १५१२, पैठण १७३२, औरंगाबाद १४४५, तर गंगापूर तालुक्यात १४४८ उमेदवार रिंगणात आहेत.
जिल्ह्यातील लक्षवेधी ग्रामपंचायती
जिल्ह्यात लक्षवेधी असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये पैठण, वैजापूर, सिल्लोड आणि औरंगाबाद तालुक्यात लक्षवेधी निवडणुका होणार आहेत. औरंगाबाद, पैठण तालुक्यातील औद्योगिक वसाहतींच्या हद्दीतील ग्रामपंचायत निवडणुकींकडे सर्वांचे लक्ष आहे. तीसगांव, पंढरपूर या ग्रामपंचायती लक्षवेधी आहेत.
कोणत्या तालुक्यात किती ग्रामपंचायती
वैजापूर १०५, सिल्लोड ८३, कन्नड ८३, पैठण ८०, औरंगाबाद ७७, गंगापूर ७१, फुलंब्री ५३, सोयंगाव ४०, तर खुलताबादमध्ये २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.
निवडणूक प्रक्रिया अधिकाऱ्यांची माहिती अशी
निवडणुक प्रक्रिया अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी सांगितले की, जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान आणि १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.