तर सहा महिन्यांत महाराष्ट्र भारनियमनमुक्त करू- फडणवीस
By Admin | Updated: August 20, 2014 01:49 IST2014-08-20T01:39:04+5:302014-08-20T01:49:40+5:30
भोकरदन : राज्यातील आघाडी सरकारमधील नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी आलेले अनुदान लाटून खाल्ले,खळबळजनक असा आरोप करीत राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर सहा महिन्यांत

तर सहा महिन्यांत महाराष्ट्र भारनियमनमुक्त करू- फडणवीस
भोकरदन : राज्यातील आघाडी सरकारमधील नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी आलेले अनुदान लाटून खाल्ले,खळबळजनक असा आरोप करीत राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर सहा महिन्यांत आम्ही महाराष्ट्र भारनियमनमुक्त करू, असे आश्वासन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
भोकरदन व जाफराबाद तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने मंगळवारी भोकरदन येथील उपविभागीय कार्यालयावर फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यात युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष पाटील दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात विसर्जित झाल्यानंतर झालेल्या सभेत बोलताना आ. फडणवीस पुढे म्हणाले की, निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांसमोर संकटे निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना साथ देण्याऐवजी राज्य सरकार त्यांची हेळसांड करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात एक लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शासनाने जर सिंचनाचे ७० हजार कोटी रुपये भ्रष्टाचार न करता खर्च केले असते तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या असत्या. कारण सिंचनामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले असते. सरकार केवळ कमिशन मिळविण्यासाठी विजेची कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. यावेळी संतोष दानवे म्हणाले की, या मतदारसंघात गेल्या १३ वर्षांपासून सत्ताधारी आमदार आहे. मात्र त्यांना विकास काय आहे, याची माहिती नाही. केवळ अधिकाऱ्यांनी प्रस्ताव दाखल केलेल्या कामांची यादी देऊन निधी आणल्याचा खोटा दावा ते करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. भोकरदन-सिल्लोड रस्त्यासह अनेक रस्त्यांच्या कामांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते चार महिन्यांपूर्वी भूमीपूजन करण्यात आले. मात्र अद्यापही या रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही, असे सांगून संतोष दानवे यांनी सरकारने आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करावा, अशी मागणी केली.
यावेळी संतोष लोखंडे, मुकेश चिने यांची भाषणे झाली. मोर्चात एकनाथराव जाधव, शिवाजीराव थोटे, लक्ष्मण मळेकर, रमेश गव्हाड, विजयसिंह परिहार, राजेंद्र देशमुख, कौतिकराव जगताप, गोविंदराव पंडित, बळीराम कडपे, कमलाकर साबळे, इद्रिस मुलतानी, शेषराव कळंबे, गणेश रोकडे, प्रकाश गव्हाड, भाऊसाहेब काकडे, शिवराम कड, भगवान खाकरे, गणेश वराडे, रमेश पांडे, विठ्ठल चिंचपुरे, कैलास गव्हाड, मधुकर तांबडे, रमेश मुरकुटे, गणेश ठाले, शालिकराम म्हस्के, देवीदास देशमुख, हिवाळे, गणेशराव फुके, भानुदास सरोदे, विजय कड, अनील गावंडे, राहुल ठाकूर, पठाण, अक्रम कुरैशी, पंढरीनाथ खरात, जयेश प्रशाद, रमेश बिरसोने, शर्मा, राजेंद्र जोशी, भूषण शर्मा, शेख हामद यांच्यासह भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील भाजपा, सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चात आ. फडणवीस यांना आसूड भेट देण्यात आला. मोर्चा निघण्यापूर्वी आ. फडणवीस, संतोष दानवे यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. एन.आर. शेळके यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. सभेचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन रामेश्वर सवडे यांनी केले. (वार्ताहर)
भोकरदन शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुकेश चिने, इम्रानखाँ पठाण, सपाचे शहराध्यक्ष अक्रम कुरैशी, भीमराव कामकर, रमेशभाई पगारे, सुदाम बोर्डे, बाबरभाई, इरफान शहा, सांडू सेठ इंगळे आदींनी भाजपात प्रवेश केला. त्यांचे आ. फडणवीस यांनी स्वागत केले
४केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अनुपस्थितीत संतोष दानवेंनी मोर्चा यशस्वी केल्याची चर्चा यावेळी होती.