सहा महिन्यांत शहरात १४ कुमारीमाता

By Admin | Updated: June 21, 2014 00:59 IST2014-06-21T00:33:41+5:302014-06-21T00:59:11+5:30

प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद संध्या (नाव बदलले आहे) या २० वर्षांच्या एका अविवाहित युवतीने मागील महिन्यात घाटीत एका गोंडस बाळाला जन्म दिला.

In six months, 14 Kummenta in the city | सहा महिन्यांत शहरात १४ कुमारीमाता

सहा महिन्यांत शहरात १४ कुमारीमाता

प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद
संध्या (नाव बदलले आहे) या २० वर्षांच्या एका अविवाहित युवतीने मागील महिन्यात घाटीत एका गोंडस बाळाला जन्म दिला. गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यातून ती गरोदर राहिली. बदनामी होईल या भीतीने आणि घरच्यांच्या दबावामुळे तिने गाव सोडले व औरंगाबाद गाठले. आज संध्या आधारगृहात आश्रयाला असून, तिचे बाळ अनाथालयात ठेवण्यात आले आहे. लैंगिक अत्याचाराला बळी पडून कुमारीमाता बनलेली संध्या ही काही पहिलीच मुलगी नाही. मागील सहा महिन्यांत अशा १४ तरुणी कुमारीमाता बनल्याची माहिती समोर आली आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे कुटुंबाच्या प्रतिष्ठेपायी १४ पैकी एकाही कुमारी मातेने फसवणूक करणाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार दिलेली नाही. तरुणींच्या असहायतेचा फायदा घेतल्यानंतरही अनेक दोषी व्यक्ती मात्र समाजात ताठ मानेने वावरत आहेत. कुमारीमातांच्या प्रश्नाकडे मात्र समाज गांभीर्याने बघण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.
तरुणी शहरातच काय ग्रामीण भागातही सुरक्षित नाहीत. प्रेमाच्या जाळ्यात किंवा लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या काही घटनाच समोर येतात; पण कुटुंबाच्या इज्जतीपायी अनेक प्रकरणे दाबली जात आहेत. गर्भधारणा झाल्यावर ‘तो मी नव्हेच’ असे प्रियकराने हात झिडकारेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. जन्म दिल्यानंतर आईने बाळाला कमीत कमी ६ महिने तरी दूध पाजणे गरजेचे असते; पण कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने एक दिवस ते महिनाभरापर्यंतची मुले अनाथालयात आणून टाकली जात आहेत.
गेल्या ६ महिन्यांत १४ बाळे आई जिवंत असतानाही तिच्या दुधाला मुकली आहेत. मागील साडेपाच महिन्यांत औरंगाबादेतील शासकीय व खाजगी रुग्णलयांत १४ कुमारीमातांनी बाळांना जन्म दिला. यात ४ स्त्री, तर ९ पुरुष जातीच्या अर्भकांचा समावेश आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाला जगण्याचा हक्क आहे. त्यास हक्क प्राप्त करून देण्यासाठी बालकल्याण समिती, अनाथालये शासनाने निर्माण केली. मात्र, लैंगिक अत्याचार करून बाळांची जबाबदारी झटकण्याचे प्रकार घडत आहेत.
पाप कुणाचे, शाप कुणाला!
गेल्या महिन्यात घाटीत संध्या (नाव बदलले आहे) या २० वर्षांच्या तरुणीने बाळाला जन्म दिला. सिझेरियन झाल्याने सात दिवस तिला तेथे ठेवण्यात आले. या काळात तिचे कोणी नातेवाईक भेटायला आले नाहीत. घाटीतील डॉक्टरांनी तिची चौकशी केली असता ती अविवाहित असून लैंगिक अत्याचार करणाऱ्याच्या धाकाने घर सोडून ती औरंगाबादेत आल्याचे तिने सांगितले.
घाटीतील समाज कार्यकर्त्यांनी तेजल आधारगृहात तिला तात्पुरत्या पुनर्वसनासाठी पाठविले आहे. आधारगृहात संध्याने तिला काय काय सोसावे लागले ते सांगितले.
संध्या ग्रामीण भागात राहत होती. तिच्या लहानपणीच तिची आई वारली. तिचे वडील व भाऊ मजुरी करून घरखर्च भागवतात. त्याच गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
संध्या गरोदर राहिल्याचे कळल्यावर गावात आपली बदनामी होईल, या भीतीने त्या व्यक्तीने संध्याचे वडील व भावाला धमक्या द्यायला सुरुवात केली.
तिला गावातून हाकलून देण्यासाठी दडपण आणणे सुरू केले. वडिलांची बदनामी होईल म्हणून संध्या घरातून पाच हजार रुपये घेऊन एका महिलेसोबत औरंगाबादेत आली.
येथेही तिचे दुर्दैव आड आले. जिच्यावर तिने विश्वास टाकला त्याच महिलेने संध्याकडील ५ हजार रुपये लुबाडले.
साडेपाच वर्षांत १२३ कुमारीमाता
वर्ष कुमारीमातांची संख्या
२००९ ४६
२०१० ०३
२०११ १६
२०१२ २२
२०१३ २२
२०१४ (जून) १४
संध्या हॉटेलमध्ये भांडे घासायचे काम करू लागली. प्रसूतिवेदना सुरू झाल्यावर संध्या घाटीत आली. तेथे तिने बाळाला जन्म दिला.
अत्याचाराने लादलेले मातृत्व व संध्याच्या रूपाने समोर आलेले ते समाजवास्तव अस्वस्थ करणारे आहे.
संध्या असो की, अन्य कुमारीमाता त्यांच्यावर मातृत्व लादणारे समाजात बिनधास्त वावरत असतात आणि या कुमारीमातेच्या पोटी जन्मलेले बाळ आई असूनही तिच्या दुधाला मुकते. पाप कोणाचे, शाप कोणाला असाच हा प्रकार आहे.
पल्लवी प्रशिक्षण सुरू करणार
कुमारीमातांची संख्या दरवर्षी वाढत आहे. सध्याच्या जीवन पद्धतीत मोबाईल, व्हॉटस्अपमुळे नको त्या बाबींकडे तरुण-तरुणी वळत आहेत. त्याचा योग्य वापर करणे सोडून दुरुपयोग वाढला आहे. आई-वडिलांचे दुर्लक्ष यास कारणीभूत ठरत आहेच. शिवाय प्रतिष्ठा जाईल म्हणून पीडित तरुणीला पोलीस ठाण्यात जाण्यापासून जन्मदातेच रोखत आहेत. वयात आलेल्या मुलींसाठी आम्ही लैंगिक शिक्षणावर आधारित पल्लवी उपक्रम सुरू केला आहे. आता तरुण मुलांसाठीही अशा कार्यशाळा घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
-राजश्री देवकर, भारतीय समाजसेवा केंद्राच्या संचालिका
गुन्हेगाराला अटक होऊ शकते
जर कुमारीमातेने आपल्यावर मातृत्व लादणाऱ्या त्या व्यक्तीचे नाव सांगितल्यावर व तक्रार दिल्यास बालकल्याण समिती कलम १५३ (३) प्रमाणे त्या व्यक्तीस अटक करण्याचे आदेश पोलिसांना देऊ शकते; परंतु समितीसमोर जेव्हा या कुमारीमाता बाळाला आणून सोडतात तेव्हा त्या त्यागपत्र देतात. मात्र, लैंगिक अत्याचार करणाऱ्यांचे नाव सांगत नाहीत. त्यांनी धाडस करून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली, तर कायद्याने गुन्हेगाराला अटक होऊ शकते. -अ‍ॅड. रेणुका घुले
ओळखींच्याकडूनच
लैंगिक अत्याचार
पीडित कुमारीमातांशी चर्चा केली असता त्यांच्यापैकी बहुतांश जणींना जवळचे नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे सत्य समोर आले. स्त्री गरोदर राहिल्यावर अत्याचार करणारी व्यक्ती हात वर करते. जन्मदात्यांच्या प्रतिष्ठेपायी किंवा आपण पोलिसांत तक्रार दाखल केली तर मारून टाकण्याची धमकी मिळत असल्याच्या भीतीने या तरुणी पोलिसांत तक्रार देत नाहीत. यामुळेच लैंगिक अत्याचार करणारे समाजात मोकाट फिरत आहेत. -डॉ. अर्चना गणवीर,
सेजल आधारगृहाच्या संचालिका

Web Title: In six months, 14 Kummenta in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.