शिवणीच्या तरुणाला महाराष्ट्र केसरीचे वेध
By Admin | Updated: June 8, 2014 00:54 IST2014-06-08T00:42:19+5:302014-06-08T00:54:33+5:30
व्यंकटेश वैष्णव/ बीड जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एका ध्येयवेड्या तरुणाने हे सारे करुन दाखवले आहे़ अक्षय सखाराम शिंदे (रा़ शिवणी ता़ बीड) असे त्या पहेलवानाचे नाव़.

शिवणीच्या तरुणाला महाराष्ट्र केसरीचे वेध
व्यंकटेश वैष्णव/ बीड
हजार-बाराशे लोकवस्तीत सर्वसामान्य कुटुंबातलं पोरगं पाचवीत असताना वडिलांबरोबर जत्रेतल्या कुस्त्या बघायला जाते काय़़़ तिथल्या कुस्त्या पाहून मोठे होऊन पहेलवान बनायचयं अशी खुणगाठ मनाशी बांधते कायं.. अन् मराठवाडा केसरीचा किताब पटकावते काय़़़ हे सगळं स्वप्नवत; परंतु जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एका ध्येयवेड्या तरुणाने हे सारे करुन दाखवले आहे़ अक्षय सखाराम शिंदे (रा़ शिवणी ता़ बीड) असे त्या पहेलवानाचे नाव़ त्याला आता महाराष्ट्र केसरीचे वेध लागले आहेत़
आपल्या व कुटुंबाच्या मागासलेपणावर रडत बसणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे़; पण शून्यातून विश्व निर्माण करविण्याची धमक व चमक खूपच कमी जणांमध्ये असते़ अशीच धमक अन् चमक असलेल्या बीड तालुक्यातील कुस्तीगीर अक्षय शिंदे याने बीड जिल्ह्याचे नाव राज्यभर गाजवलेले आहे़ २२ वर्षांच्या अक्षयचा जन्म बीड तालुक्यातील शिवणी येथे शेतकरी कुटुंबात झाला़ सखाराम व संजीवनी या दाम्पत्याची अक्षय व अभय ही दोन मुले़ मुलांनी चांगला माणूस व्हावे एवढीच अपेक्षा आई-वडिलांची होती़ उन्हाळ्यात बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी जत्रा भरतात़ वडील या जत्रेला दोन्ही मुलांना घेऊन जायचे़ जत्रेतल्या कुस्त्या दाखवायचे़ पुढे चालून जत्रेतल्या कुस्त्यांचा प्रभाव अक्षयच्या कोवळ्या मनावर पाचवीत असतानाच पडला़ कुस्तीचा फड अक्षयला खुणवू लागला़ आपणही मोठं होऊन जत्रेतल्या पहेलवानांप्रमाणे कुस्त्यांचे फड गाजवायचे, असे अक्षयने ठरवले़ प्राथमिक शिक्षण गावातच घेतले़ पाचवीला असताना जरूडच्या यात्रेत पहिली कुस्ती अक्षयने केली़ ही कुस्ती अक्षय जिंकला़ दरम्यानच्या काळात बीड जिल्ह्यातील नाळवंडी, बोरफडी, ईमामपुर आदी ठिकाणच्या यात्रेतला कुस्त्यांचा फड अक्षयने गाजवला़ आता अक्षयला जत्रेतल्या कुस्तीपेक्षा राज्यस्तरावरील कुस्त्यांची ओढ लागली़ महाविद्यालयीन शिक्षणासाठी अक्षय बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील कला वाणिज्य महाविद्यालयात आला़ तेथे आल्यानंतर विद्यापीठ स्तरावरील कुस्त्याला सुरूवात केली़
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२ च्या दरम्यान अमरावती येथे झालेल्या अंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत दिल्ली येथील सत्यव्रत नावाच्या कुस्तीगिराशी अक्षयची कु स्ती झाली़ यामध्ये अक्षय कुस्ती हरला, परंंतु या अपयशाने खचून न जाता अक्षयने प्रचंड मेहनत घेतली़ नुकतीच बीएची परीक्षा देऊन कुस्तीच्या पुढील तयारीसाठी अक्षयने पुणे येथे जाण्याचा निर्णय घेतला व पुण्याच्या मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात ज्ञानेश्वर मांगडे यांच्या तालमीत प्रवेश घेतला़ येथे कुस्तीतील सगळे बारकावे सध्या अक्षय शिकत असून त्याने आतापर्यंत गोंदिया येथे झालेल्या ९६ किलो वजन गटात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे़ यानंतर परभणी येथे झालेल्या मराठवाडा केसरी स्पर्धेत कुस्ती जिंकून मराठवाडा केसरीचा किताब व चांदीची गदा पटकावली असल्याचे अक्षय मोठ्या अभिमानाने सांगतो़ तो सांगतो, १२० किलो वजन गटात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकायची आहे़ हे माझे स्वप्न आहे़
माझे वडील मला महिन्याला पंधरा ते वीस हजार रूपये पाठवतात़ महाराष्ट्र केसरीचा किताब मिळविण्याचे माझे स्वप्न आहे़, असे अक्षयने ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले़
दुष्काळामुळे झाली होती फरपट
एक वर्षापूर्वी जिल्ह्यात दुष्काळ निर्माण झाल्याने गावाकडील उत्पन्न घटले. परिणामी, वडील मला महिन्याला पैसे पाठवू शकत नव्हते. यावेळी काही पुढाऱ्यांनी मदत केली. त्यामुळे पुढील सराव करता आला. तसेच या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांची मोलाची मदत झाल्याचेही त्याने सांगितले.