उन्हाळ्यात जाणवणार दीड लाख मेट्रिक टन चाऱ्याचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 21:25 IST2018-11-13T21:24:47+5:302018-11-13T21:25:12+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात ६ लाख ७६ हजार १८० लहान-मोठी जनावरे आहेत. ८ लाख १० हजार ८४ मे.टन चाºयाची आवश्यकता असून, त्यापेक्षा दीड लाख मे.टन चारा कमी आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणी व चाराटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. आतापासूनच पशुखाद्य महागल्याने पशुपालकांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे.

उन्हाळ्यात जाणवणार दीड लाख मेट्रिक टन चाऱ्याचा तुटवडा
जिल्ह्यात ७ लाख जनावरे : पशुखाद्य महागल्याने पशुपालकांसमोर नवीन संकट
औरंगाबाद : जिल्ह्यात ६ लाख ७६ हजार १८० लहान-मोठी जनावरे आहेत. ८ लाख १० हजार ८४ मे.टन चाºयाची आवश्यकता असून, त्यापेक्षा दीड लाख मे.टन चारा कमी आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणी व चाराटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. आतापासूनच पशुखाद्य महागल्याने पशुपालकांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे.
जिल्ह्यात ६५ महसूल मंडळे असून, त्यापैकी २८ मंडळांत अपेक्षित सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला. ५१ ते ७५ टक्क्यांमध्ये २९, तर ७६ ते १०० टक्क्यांमध्ये ८ महसूल मंडळांचा समावेश आहे. ऐन वेळेवर पाऊस न पडल्याने खरीप पिकांचे ६० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. कमी पाण्यामुळे रबी पेरणीचे धाडस करण्यास शेतकरी धजावत नसल्याचे दिसत आहे. यामुळे दिवाळी आधीपर्यंत जिल्ह्यात अवघे ४ टक्के पेरणी झाली होती. जिथे माणसांनाच पिण्यासाठी कमी पाणी आहे तिथे जनावरांचे काय, त्यात कडबा कमी असल्याने उन्हाळ्यात जनावरांना कसे सांभाळायचे, असा यक्ष प्रश्न पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे.
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात लहान-मोठी ६७६१८० जनावरे आहेत. ही आकडेवारी २०१२ मध्ये झालेल्या पशुगणनेनुसार आहे. त्यांना दररोज ३५५३ मे.टन चारा लागतो, तर महिनाभरात १०६५६२ मे.टन चारा लागतो. यानुसार ३१ मे २०१९ पर्यंत ८१००८४ मे.टन चाºयाची आवश्यकता आहे; पण प्रत्यक्षात ६६०६२५ मे.टन चारा उपलब्ध आहे. म्हणजे उन्हाळ्यात १ लाख ४९ हजार ४५९ मे.टन चाºयाची टंचाई जाणविणार आहे.
याशिवाय पाण्याचा प्रश्नही बिकट आहे. अनेक गावांत सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात पशुखाद्याचे भाव वाढू लागल्याने आता जनावरांना कसे सांभाळावे, असा प्रश्न पशुपालकांना पडू लागला आहे. परिणामी, अनेकांनी पशुधन विक्रीसाठी काढले आहे. मागील दुष्काळात चारा छावण्यांमध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाला होता. अनेक छावण्यांची चौकशी करण्यात आली. हा अनुभव लक्षात घेता यंदा चारा छावण्यांविषयी राज्य सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. नियमही आणखी कठोर करण्यात आले आहेत. यामुळे चारा छावण्या किती उघडतील व पशुधन वाचविण्यासाठी चारा कुठून उपलब्ध केला जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कडबा महागला
दुष्काळामुळे भविष्यातील चाराटंचाई लक्षात घेता आता कडबा महाग होऊ लागला आहे. कडब्याच्या भावात २०० ते ३०० रुपयांनी भाववाढ होऊन ४००० ते ४५०० रुपये प्रति शेकडा विकत आहे, तर ऊसकुट्टीचे भाव १०० रुपयांनी वाढून २०० ते २५० रुपये प्रतिगोणी विकत आहे. सरकी ढेप १९०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल विकली जात आहे. मात्र, पुढील महिन्यात नवीन सरकी उपलब्ध झाल्यावर सरकी ढेपचे भाव थोडे कमी होतील. मात्र, कडबा व ऊसकुट्टीचे भाव वाढतील, असे विक्रेत्यांनी सांगितले. यामुळे म्हशी, गाय, बैल सांभाळणाºयांना मोठी कसरत करावी लागणार आहे.