जालना : जलयुक्त शिवार योजनेद्वारे आगामी पाच वर्षांत राज्यातील पाच हजार गावे दुष्काळमुक्त होतील. पण सरकारी यंत्रणेला मर्यादा असल्याने उर्वरित गावांनाही न्याय मिळावा, या हेतूने शिवसेनेच्या वतीने शिवजल क्रांती उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याद्वारे मराठवाड्यातील अनेक गावांत पाणीटंचाई दूर हेईल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी पत्र परिषदेत व्यक्त केला.जालना जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी उद्योगमंत्री देसाई यांनी विविध ठिकाणांना भेटी दिल्या. पत्रकारांशी बोलताना देसाई म्हणाले की, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनेच्या धोरणानुसार आम्ही विविध उपक्रम राबवित असून, पक्षाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाती घेण्यात येणार आहेत. त्यापैकी शिवजलक्रांती हा उपक्रम असल्याचे देसाई म्हणाले. पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने ५ हजार गावे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत निवडली आहेत. पण टंचाईग्रस्त गावांची संख्या मोठी असल्याने केवळ टँकरवर अवलंबून असलेल्या गावांची जबाबदारी शिवसेनेने उचलत तेथे शिवजल क्रांती उपक्रम राबवत आहे. राज्यात अनेक वर्षांपासून मोठ्या धरणांची कामे रखडली आहेत. यामध्ये पाणी काही जिरले नाही, मात्र पैसा मोठ्या प्रमाणात जिरल्याचे टीकाही त्यांनी यावेळी केली. मराठवाड्यात २००० हेक्टर हे लागवडीचे क्षेत्र आहे. मात्र, केवळ ५०० हेक्टर क्षेत्रात पाणलोट विकास कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणावर सिंचनांची कामे करावी लागणार आहे. यासाठी ही लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली. यासाठी स्वयंसेवी संस्था व जलतज्ज्ञांचीही मदत घेतली असून, लाहोटी आणि प्रफुल्ल कदम हे मार्गदर्शन करीत आहेत. दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजना करण्यात आली असून, याद्वारे दारिद्रय रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील अशा सर्व शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्य वितरित केले जाणार असल्याचे देसाई म्हणाले. पत्र परिषदेस आमदार अर्जुन खोतकर, संपर्क नेते विनोद घोसाळकर, आ. डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर , ए.जे. बोराडे, शिवाजी चोथे, औरंगाबादचे अंबादास दानवे, माजी आ. संतोष सांबरे, जि.प. उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाळा परदेशी, संतोष मोहिते, दिनेश फलके आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पक्षाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून, यामध्ये ई- प्रबोधन, शुद्ध पाणी पुरवठा, सोलार दिवे आदींचा समावेश असणार आहे. ४अनुशेष दूर करण्यापेक्षा प्रश्न सुटले पाहिजेत ही पक्षाची भूमिका असून, त्या दृष्टिनेच विविध समाजपयोगी उपक्रम शिवसेनेच्या वतीने राबविले जात असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. ४जालना तालुक्यातील नाव्हा, बाजी उम्रद, वखारी या गावांतील सुमारे ३०० बंधारे, नाले व बांधबदिस्ताची खोली वाढविण्यात आली. आमदार अर्जुन खोतकर यांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे परिसरात जलसाठा वाढल्याचे देसाई म्हणाले. हा उपक्रम न राहता एक लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गावे टँकरमुक्त करण्यासाठी शिवजलक्रांती
By admin | Updated: August 18, 2015 00:51 IST