विद्यापीठात दबावाचे राजकारण शिगेला
By Admin | Updated: January 20, 2015 01:29 IST2015-01-20T01:24:32+5:302015-01-20T01:29:18+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंवर दबाव आणून पाहिजे तसा निर्णय पदरात पाडून घ्यायचा,

विद्यापीठात दबावाचे राजकारण शिगेला
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंवर दबाव आणून पाहिजे तसा निर्णय पदरात पाडून घ्यायचा, ही अपप्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. चार दिवसांपूर्वीच एका संघटनेने परीक्षा नियंत्रक आणि कुलसचिवपदावरून कॅप्टन सुरेश गायकवाड यांना हटविण्यास कुलगुरूंना भाग पाडले. आज प्राध्यापकांच्या संघटनेने कुलसचिवपदावर नेमलेल्या डॉ. सिरसाट यांना हटविण्यासाठी कुलगुरूंना घेराव घातला.
‘बामुक्टा’ व ‘मुप्टा’ शिक्षक संघटनेच्या २५-३० पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी कुलगुरूंच्या दालनात जाऊन घेराव घातला. तेव्हा कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात आपण सविस्तर विचारविनिमय करू, असे सांगितले. त्यानुसार त्या सभागृहात ‘बामुक्टा’चे सचिव डॉ. सुहास मोराळे, जिल्हाध्यक्ष डॉ. विलास खंदारे, जालन्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदीप पाटील, बीडचे जिल्हाध्यक्ष डॉ. एम.बी. धोंडगे, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. गोपाल बच्छिरे, ‘मुप्टा’चे सचिव प्रा. सुनील मगरे, डॉ. संभाजी वाघमारे, राजेंद्र जाधव आदींसह अन्य प्राध्यापकांच्या उपस्थितीत कुलगुरूंना निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर कुलगुरू हे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना ऐकून घेत असतानाच बाहेर नगरसेवक अमित भुईगळ, ‘स्वाभिमानी मुप्टा’चे डॉ. शंकर अंभोरे, डॉ. किशोर साळवे, प्रा. ईश्वर मोरे व अन्य कार्यकर्ते कुलगुरूंच्या दालनासमोर येऊन धडकले. सभागृहामध्ये ‘बामुक्टा’ व ‘मुप्टा’चे पदाधिकारी तर, बाहेर ‘स्वाभिमानी मुप्टा’चे पदाधिकारी, अशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. रात्री ९ वाजेपर्यंत दोन्ही बाजूंचा जमाव विद्यापीठात बसून होता. दरम्यान, रात्री प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले.
अडचणींचा सामना करण्याची माझी भूमिका आहे. मी घाबरणारा नाही; पण लोक समजून घेत नाहीत. विद्यापीठातील संघटनांचे वाढलेले वातावरण बंद झाले पाहिजे. संघटनांच्या बाबतीत आता व्यवस्थापन परिषदेत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. तरीही मी आशावादी आहे. सुधारणा होईल, अशी मला अपेक्षा आहे.