नंदकिशोर पाटील
मान्सून देशाच्या अर्थकारणाचा कणा आहे. वार्षिक पर्जन्यमानातील सुमारे ७० टक्के वाटा मान्सूनचा असतो. शेती, सिंचन, वीजनिर्मितीपासून ग्रामीण बाजारपेठेपर्यंत सर्वच क्षेत्रे त्यावर अवलंबून असतात. यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाचा अधिकृत अंदाज एप्रिलमध्ये अपेक्षित असला, तरी सध्याचे संकेत फारसे आशादायक नाहीत.
२०२६ च्या मान्सूनचे चित्र अधिकच गुंतागुंतीचे दिसते. जागतिक स्तरावर 'एल निनो' विकसित होण्याची शक्यता वाढत असताना देशातील सध्याची हवामान स्थितीही सावध करणारी आहे. खासगी हवामान संस्था स्कायमेटने सुमारे ६० टक्के 'सब-पार' मान्सूनची शक्यता व्यक्त केली आहे. याचवेळी मार्च महिन्यातील निरीक्षणेही अस्वस्थ करणारी आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात उत्तर, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात तापमान सरासरीपेक्षा ५ ते ७ अंशांनी जास्त नोंदले गेले. विदर्भातील अमरावती येथे ४२.२ अं.से. तापमानाची नोंद झाली. उष्णतेच्या लाटांचे हे संकेत आहेत. 'एल निनो 'च्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्यात देशातील अनेक भागांत गारपीट, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या घटना घडल्या. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह ईशान्य भारतात पिकांचे नुकसान झाले. हवामान बदलामुळे अशा टोकाच्या घटनांची वारंवारता वाढत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. हे मान्सूनपूर्व अस्थिरतेचे स्पष्ट लक्षण मानले जाते.
मान्सून कमी पडल्यास सर्वाधिक फटका शेतीला बसतो. सोयाबीन, कापूस, तूर आणि भात पिकांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो.
'एल निनो'चा होऊ शकतो त्रास...
'एल निनो' म्हणजे प्रशांत महासागरातील पृष्ठभागीय तापमानवाढ, जी जागतिक हवामान पद्धतीत बदल घडवते. भारताच्या संदर्भात या घटनेचा मान्सूनशी जवळचा संबंध आहे. १९८० नंतरच्या १४ 'एल निनो' वर्षांपैकी २ वर्षांत देशात अपुरा पाऊस पडल्याची नोंद आहे. २०२६ मध्येही अशी स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, जून ते ऑगस्ट दरम्यान 'एल निनो' विकसित होण्याची शक्यता सुमारे ६२ टक्के आहे, जी पुढे ८० टक्क्यांहून अधिक होऊ शकते. यामुळे मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात पावसात घट होण्याचा धोका अधिक आहे.
मान्सूनआधीच २७ टक्के तूट
मार्चच्या मध्यापर्यंत देशातील पर्जन्यमानात सुमारे २७ टक्के तूट नोंदली गेली आहे. प्री-मान्सून पावसामुळे जमिनीतील आर्द्रता वाढून खरीप हंगामासाठी अनुकूल परिस्थिती तयार होते. मात्र यंदा सुरुवातीपासूनच तूट असल्याने शेतीसमोरील आव्हाने अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. एप्रिल आणि मे २०२६ हे महिने मान्सूनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. भारतीय हवामान विभागाचा अधिकृत अंदाज या काळात स्पष्ट होईल.
'आयओडी'चा संभाव्य प्रभाव
काही तज्ज्ञांच्या मते, 'इंडियन ओशन डायपोल' (आयओडी) सकारात्मक राहिल्यास 'एल निनो'चा परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतो. १९९७ मध्ये 'एल निनो' असूनही भारतात सामान्य मान्सून झाला होता, यामागे सकारात्मक आयओडी कारणीभूत होता.
आयओडी म्हणजे भारतीय महासागराच्या पूर्व आणि पश्चिम भागातील समुद्राच्या तापमानातील फरक. हा फरक जास्त असेल, तर पावसाचे वितरण प्रभावित होते. मात्र सध्या आयओडी तटस्थ असल्याने 'एल निनो'चा परिणाम कमी करण्यासाठी त्याचा फारसा उपयोग होईल, असे दिसत नाही.
Web Summary : Concerns rise as forecasts predict a weaker monsoon, crucial for India's agriculture and economy. El Nino's potential impact and pre-monsoon rainfall deficits pose significant challenges for crops like soybean and cotton. IOD's neutral stance offers little buffer, making the coming months critical.
Web Summary : भारत की कृषि और अर्थव्यवस्था के लिए महत्वपूर्ण मानसून के कमजोर रहने की भविष्यवाणी से चिंता बढ़ रही है। अल नीनो का संभावित प्रभाव और मानसून से पहले वर्षा की कमी सोयाबीन और कपास जैसी फसलों के लिए महत्वपूर्ण चुनौतियां पेश करती है। आईओडी का तटस्थ रुख बहुत कम बफर प्रदान करता है, जिससे आने वाले महीने महत्वपूर्ण हो जाते हैं।