लग्न सोहळ्यांना शाळा-कॉलेजचा ‘आधार’
By Admin | Updated: May 22, 2014 00:12 IST2014-05-21T23:55:11+5:302014-05-22T00:12:38+5:30
शिरूर अनंतपाळ : उन्हाळ्यात विशेषत: मे महिन्यात लग्न समारंभाची मोठी घाई असते. त्यामुळे मंगल कार्यालये हाऊसफुल्ल असतात.

लग्न सोहळ्यांना शाळा-कॉलेजचा ‘आधार’
शिरूर अनंतपाळ : उन्हाळ्यात विशेषत: मे महिन्यात लग्न समारंभाची मोठी घाई असते. त्यामुळे मंगल कार्यालये हाऊसफुल्ल असतात. शिवाय, ते सामान्य माणसांना महागाईमुळे परवडत नाहीत. परिणामी, ग्रामीण भागातील लग्न सोहळ्यांना शाळा-कॉलेजचा ‘आधार’ घ्यावा लागतो, असेच चित्र अनेक गावांतून दिसून येत आहे. यातून शाळा-कॉलेजना शैक्षणिक वाटचाल करण्यासाठी थोडाफार मदतनिधीही उपलब्ध होत आहे. तुलसी विवाहानंतर साधारणपणे विवाह सोहळ्यांना सुरुवात होते. परंतु, त्या कालावधीत खरीप आणि रबी हंगामातील अनेक शेती मशागतीची कामे असतात. त्यामुळे विवाह समारंभास उपस्थित राहणे कठीण असते. उन्हाळ्यात विशेषत: मे महिन्यात शेतीची कामे आटोपलेली असतात. त्यामुळे मे महिन्यातच लगीनघाई सुरू असते. या महिन्याच्या शेवटी तर एकाच तारखेस अनेक विवाह समारंभ सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे मंगल कार्यालये हाऊसफुल्ल झाली आहेत. त्याच वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना ती परवडणारी सुद्धा नाहीत. यासाठी ग्रामीण भागातील विवाह सोहळ्यांना शाळा-कॉलेजचा आधार घ्यावा लागत आहे. माफक भाड्यात किंबहुना काही ठिकाणी तर मोफतच या इमारतींचा लाभ घेतला जातो. परिणामी, विवाह सोहळ्यांना शाळा-कॉलेजचा आधार मिळत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.(वार्ताहर) शैक्षणिक मदतनिधी... समाजाचा सहभाग मिळवून शैक्षणिक मदतनिधी मिळवून शाळेच्या विधायक कामांंसाठी खर्च करावेत, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात येते. त्यामुळे काही शाळा रितसर भाडे पावती देऊन शाळा-कॉलेजची इमारत लग्न समारंभासाठी देतात. परंतु, असा संकेत पाळणार्या शाळा क्वचितच असल्या तरी लग्न सोहळ्यासाठी शाळा-कॉलेजचाच वापर होतो. अवकाळीचाही अडथळा... मार्च महिन्यापासून सातत्याने अवकाळी पावसाचा फटका विवाह समारंभास बसत आहे. वादळी वार्यात शामियाने मंडप उडून फाटून जात आहेत. त्यामुळे विवाह सोहळ्यावर पाणी पडत आहे. यामुळेही शाळा-कॉलेजचा ‘आधार’ घ्यावा लागत आहे. माफक भाड्यात किंबहुना मोफत इमारत अन् सुरक्षितता मिळते.