पाण्याच्या टँकरसाठी सरपंचाने घेतले विष
By Admin | Updated: December 18, 2015 00:18 IST2015-12-18T00:05:16+5:302015-12-18T00:18:34+5:30
गंगापूर : टँकर सुरू न झाल्याने येथील सरपंच विक्रम राऊत यांनी पंचायत समिती कार्यालयात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

पाण्याच्या टँकरसाठी सरपंचाने घेतले विष
गंगापूर : तालुक्यातील दहेगाव ग्रुप ग्रामपंचायतने टँकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर करून तीन महिने लोटले तरी अद्याप टँकर सुरू न झाल्याने येथील सरपंच विक्रम राऊत यांनी पंचायत समिती कार्यालयात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गुरुवारी (दि.१७) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. बेशुद्धावस्थेतील सरपंचावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विक्रम राऊत हे दुपारी विषारी औषधीच्या बाटलीसह गंगापूर पंचायत समिती कार्यालयात आले. रोजगार हमी योजनेच्या दालनात पोहोचताच त्यांनी हातातील बाटलीचे झाकण उघडण्याचा प्रयत्न केला. कार्यालयात उपस्थित काही नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी बाटली हिसकावण्याचा प्रयत्न केला; मात्र राऊत यांनी कुणासही न जुमानता भिंतीला बाटली जोरात मारली. बाटली फुटून त्यातील औषध खाली पडताच राऊत यांनी पडलेले औषध हाताने भरून तोंडात टाकले. औषध पोटात गेल्याने काही वेळातच त्यांची शुद्ध हरपली. उपस्थित जमावाने तात्काळ रिक्षा बोलावून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलविले. पुढील उपचारासाठी औरंगाबादेत पाठविण्यात आले आहे.