‘साडेसाती’ ही ज्योतिषशास्त्रातील भाकडकथा

By Admin | Updated: December 28, 2014 01:24 IST2014-12-28T01:20:50+5:302014-12-28T01:24:43+5:30

औरंगाबाद : अंधश्रद्धेमध्ये ज्योतिषशास्त्रातील ‘कर्मकांड’ आले आहे. त्यास आमचा विरोध आहे. यात साडेसाती, कालसर्पयोग, नारायणनागबळी, या भाकडकथा आहेत.

'Sadeasati' astrology | ‘साडेसाती’ ही ज्योतिषशास्त्रातील भाकडकथा

‘साडेसाती’ ही ज्योतिषशास्त्रातील भाकडकथा

औरंगाबाद : अंधश्रद्धेमध्ये ज्योतिषशास्त्रातील ‘कर्मकांड’ आले आहे. त्यास आमचा विरोध आहे. यात साडेसाती, कालसर्पयोग, नारायणनागबळी, या भाकडकथा आहेत. या अंधश्रद्धा ज्योतिषशास्त्रातून गेल्या पाहिजे, याकरिता आमचा लढा सुरू आहे. यासाठी आम्ही प्रा. श्याम मानव यांच्यासोबत काम करण्यास तयार आहोत. या प्रश्नी २०१९ पर्यंत ते आमच्यासोबत असतील, अशी भविष्यवाणी बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार यांनी येथे केली.
२० व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनात ते बोलत होते. अधिवेशनाचे उद्घाटन खा.चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झाले. शुक्रवारी शहरात आयोजित एका कार्यक्रमात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा.श्याम मानव यांनी ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र पूर्णत: थोतांड असल्याचा आरोप केला होता. हाच धागा पकडत जकातदार यांनी स्पष्ट केले की, ज्योतिषशास्त्र हे थोतांड नाही. कोणतेही शास्त्र नियमावर आधारित असते, तसेच ज्योतिषशास्त्र नियमावर आधारित आहे. ज्योतिर्गणितातून ज्योतिष विज्ञानाची निर्मिती झाली. यासाठी गॅलिलिओने दोन भाग पाडले होते. ग्रहाचा परिणाम पृथ्वीवर मनुष्य, प्राणीमात्रावर होतो हे सिद्ध झाले आहे. विज्ञानाच्या कसोटीवर पाहिले तर सूर्य तळपत असतो. त्याची किरणे डोक्यावर पडतात तेव्हा त्याचा किती परिणाम होतो ही टक्केवारी ज्योतिषशास्त्राने शोधून काढली आहे. ज्योतिषशास्त्र अंधश्रद्धा पसरवीत नाही. मनुष्याला प्रयत्नवादी बनवितो, दैववादी बनवत नाही. प्रास्ताविक मधुकांत कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन अ‍ॅड. मालती शर्मा यांनी केले. या दोनदिवसीय अधिवेशनासाठी राज्यभरातून ज्योतिषी येथे आले आहेत.
अधिवेशनात पुरस्कार देण्यात आले. यात य. न. मग्गीरवार यांना जीवन गौरव पुरस्कार, मधुकर कोनार्डे यांना विशेष गौरव पुरस्कार, तर भूषण रत्नाकर यांना युवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस
ज्योतिष अधिवेशनाचा उद्या २८ रोजी शेवटचा दिवस आहे. वरद गणेश मंदिरातील सभागृहात सकाळी ९.३० वाजेपासून सत्राला सुरुवात होणार आहे. समारोपाच्या सत्राला सायंकाळी ५.४५ वाजता सुरुवात होईल. यावेळी अध्यक्षस्थान डी. वाय. पाटील अ‍ॅस्ट्रॉलॉजी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रा. रमणलाल शहा भूषविणार आहेत.

Web Title: 'Sadeasati' astrology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.