४४ बालकांना आरटीईचा आधार
By Admin | Updated: May 29, 2014 00:34 IST2014-05-29T00:15:11+5:302014-05-29T00:34:00+5:30
चेतन धनुरे , लातूर शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील १३ नामांकित शाळांमधून ४४ बालकांना कोणत्याही प्रवेश शुल्काशिवाय मोफत प्रवेश देण्यात आला आहे़

४४ बालकांना आरटीईचा आधार
चेतन धनुरे , लातूर राज्य शासनाच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार यंदाच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील १३ नामांकित शाळांमधून ४४ बालकांना कोणत्याही प्रवेश शुल्काशिवाय मोफत प्रवेश देण्यात आला आहे़ आता शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर दुसरा टप्पा राबविण्यात येत असून, यावर्षी २५० हून अधिक बालकांना या योजनेचा लाभ मिळण्याबाबत शिक्षण विभागास आशा आहे़ मागील शैक्षणिक वर्षापासून शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील बालकांना मोफत प्रवेश देण्यात येत आहे़ गतवर्षी या योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यातील २९ नामांकित शाळांमधून १५८ बालकांना पहिलीत प्रवेश देण्यात आला होता़ यावर्षीची प्रक्रिया सुरु झाली असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १३ शाळांमध्ये ४४ बालकांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे़ त्यात लातुरातील नामांकित गोल्डक्रेस्ट हाय व सनशाईन इंग्लिश स्कूलमध्ये प्रत्येकी ५ तर श्री बंकटलाल लाहोटी व श्री श्री रवीशंकर इंग्लिश स्कूलमध्ये प्रत्येकी १ प्रवेश झाला आहे़ उदगीरमधील ३ नामांकित शाळांमधून १३, मुरुड येथे ६, चाकूर येथे १, निलंगा व किल्लारी येथे प्रत्येकी २, ताडमुगळी व शिरुर अनंतपाळमध्ये प्रत्येकी ४ असे एकूण ४४ प्रवेश या कायद्यातंर्गत झाले आहेत़ या योजनेंतर्गत जिल्ह्यातील जवळपास ११८ शाळांचा समावेश आहे़ या शाळांमध्ये शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार दुसर्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया १ जूनपासून राबविण्यात येणार आहे़ त्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जोरदार तयारी सुरु केली आहे़ प्रवेशासंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक तालुक्यास गटशिक्षणाधिकारी किंवा विस्तार अधिकारी व लातुरातील १२ नामांकित शाळांसाठी प्रत्येकी एका समन्वयकाची नियुक्ती करण्यात आली आहे़ शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांच्या सूचनेप्रमाणे लवकरच दर्शनी भागात बॅनर्सही लावले जाणार असल्याची माहिती विस्तार अधिकारी चव्हाण यांनी दिली़ कोणाला मिळणार लाभ़़़? वंचित घटकातून अनुसूचित जाती-जमाती व अपंग बालकांना या योजनेचा लाभ मिळतो़ तसेच वार्षिक उत्पन्न १ लाखाच्या आत असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकाच्या पाल्यासही या योजनेंतर्गत प्रवेश घेता येतो़ मात्र प्रवेशपात्र बालकाचे पालक राहत असलेल्या घरापासून १ किलोमीटरच्या आतील किंवा त्याहून नजिकच्या शाळेतच प्रवेश घेता येईल़ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात जातीची अट नाही मात्र पालकाचे उत्पन्न १ लाखाच्या आत असल्याचे सक्षम अधिकार्याचे प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे़ वंचित घटकास जात व रहिवासी प्रमाणपत्र गरजेचे आहे़ कशी आहे प्रक्रिया़़? पहिलीतील प्रवेशपात्र विद्यार्थीसंख्येच्या २५ टक्के जागा या योजनेंतर्गत राखीव आहेत़ पालक राहत असलेल्या घरापासून १ किमीच्या आतील शाळेच्या मुख्याध्यापकाकडून या योजनेचा प्रवेश अर्ज घेता येईल़ तो भरुन आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत शाळेकडे सादर करावा़ या अर्जाची छाननी करुन शाळा प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी शाळेत डकवेल़ जर प्रवेश अर्जात त्रुटी असतील तर त्या शाळेने संबंधित पालकास कळविणे बंधनकारक आहे़ त्रुटीची पूर्तता झाल्यानंतरच प्रवेश निश्चिती होईल़ जर एखाद्या शाळेत २५ टक्केपेक्षा जास्त अर्ज आले असतील तर त्या ठिकाणी सोडत पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहे़ ज्या शाळांमध्ये मुदतीत २५ टक्के जागा भरत नसतील तरी त्या शाळांना या जागांवर अन्य विद्यार्थ्यास प्रवेश देता येत नाही़ या कोट्यातून भरलेल्या विद्यार्थ्यांचा आठवीपर्यंतचा संपूर्ण शैक्षणिक खर्च शासन उचलणार आहे़