मारहाण करून भाविकांना लुटले
By Admin | Updated: June 15, 2014 00:54 IST2014-06-15T00:45:28+5:302014-06-15T00:54:31+5:30
औरंगाबाद : ७-८ भाविकांना ८ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करीत ८ हजार रुपये लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बाबा पेट्रोल पंप चौकातील शहर बसथांब्याजवळ घडली.

मारहाण करून भाविकांना लुटले
औरंगाबाद : तुळजापूर येथे देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी जीपची वाट बघत थांबलेल्या ७-८ भाविकांना ८ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करीत ८ हजार रुपये लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बाबा पेट्रोल पंप चौकातील शहर बसथांब्याजवळ घडली.
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव येथील रहिवासी गोरख भीमाशंकर वेताळ (२४) व त्याचे अन्य ६ साथीदार रात्री तुळजापूर येथे देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी रिक्षाने बाबा पेट्रोल पंप चौकात आले. तेथे उतरून ते पंचवटी हॉटेलजवळील बसथांब्याजवळ गेले. तेथे ते सर्वजण भाडे तत्त्वावर बुक केलेल्या जीपची वाट बघत उभे होते. तेवढ्यात तेथे ७ ते ८ जणांचे टोळके आले. त्यांनी गोरख व त्याच्या सहकाऱ्यांकडे आइस्क्रीम खाण्यासाठी पैसे मागून त्यांची टिंगल उडविणे सुरू केले. गोरखने आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही देवदर्शनासाठी निघालो आहोत, असे सांगितले. तेव्हा त्यांनी या सर्वांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत त्यांच्या खिशातील ८ हजार रुपये बळजबरीने हिसकावून नेले.
घाबरलेल्या अवस्थेत ते सर्वजण क्रांतीचौक ठाण्यात गेले. तेथे त्यांनी घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी रीतसर तक्रार लिहून घेतली व अज्ञात ८ जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक अशोक गिरी हे करीत आहेत. बाबा पेट्रोल पंप चौकात क्रांतीचौक ठाण्याची पोलीस चौकी आहे. या चौकीत दिवस-रात्र पोलिसांचा राबता असतो. तुळजापूरला निघालेल्या या भाविकांना लुटण्याचा थरार हा पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर घडला. चौकीतील पोलीस सतर्क असते, तर कदाचित हा प्रकार टळला असता अथवा दरोडेखोरांना वेळीच जेरबंद करता आले असते, अशी खंत या भाविकांनी व्यक्त केली.