योगशास्त्राच्या मूळ तत्वालाच हरताळ..!
By Admin | Updated: July 21, 2016 01:10 IST2016-07-21T00:59:18+5:302016-07-21T01:10:18+5:30
कळंब : शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानूसार शाळामध्ये आता प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला 'योग डे ' साजरा केला जाणार आहे.

योगशास्त्राच्या मूळ तत्वालाच हरताळ..!
कळंब : शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानूसार शाळामध्ये आता प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला 'योग डे ' साजरा केला जाणार आहे. असे असले तरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने उचीत सूचना न दिल्याने गुरूवारी जिल्हाभरातील जिल्हा परिषद शाळात नियमित वेळात म्हणजे सकाळी दहा वाजता परिपाठाच्या तासिकेत योगाचे धडे दिले जाणार आहेत. त्यामुळे ‘उपाशीपोटी योगा’ या योगशास्त्राच्या मूळ तत्वालाच हारताळ फासला जाणार असल्याचे बोलले जाते.
भारतीय योगविद्येस जगात मानाचे स्थान आहे. यामुळेच सयूंक्त राष्ट्र संघाने व्यक्तिच्या शारिरीक व आत्मिक विकासात महत्व असलेल्या योगाचा प्रचार व्हावा यासाठी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन घोषित केला. यानंतर ८ जून २०१६ रोजी राज्याचे शिक्षण विभागाने केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेचा संदर्भ एक शासन निर्णय देवून राज्यातील सर्व शाळामध्ये प्रत्येक महिन्यातील २१ तारीख ही ‘योग दिवस ’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले. यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठण करण्याच्याही सूचना या आदेशात दिल्या होत्या.
योगाचा प्रसार अधिक व्यापक व्हावा व याचा विद्यार्थ्यांच्या शारिरीक व आत्मिक विकासात फायदा व्हावा हा उदात्त हेतू यामागे आहे.गत महिन्यात सर्व शाळात सकाळच्या प्रहरी पहिला योग दिवस साजरा करण्यात आला. परंतु दूसरा योग दिवस गुरूवारी आहे. यावेळी जि.प.च्या शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या पत्रात २१ जुलैला परिपाठाच्या तासात योग दिवस साजरा करावा अशा सूचना दिल्या आहेत.
वस्तुत: याच आदेशात शाळेच्या नियमित वेळेत बदल करायचा की नाही याचा उल्लेख करणे आवश्यक होते. परंतु यासंबंधी कसलाही उल्लेख नसल्याने जिल्हा परिषदेसह बहुतांश खाजगी शाळाही सकाळी १० च्या दरम्यान नियमित वेळेनुसार भरणार आहेत. (वार्ताहर)
योग करावयाचा असेल तर तो सूर्योदयापूर्वी करणे आवश्यक आहे. तसे केले तरच त्याचे शरिराला चांगले फायदे मिळू शकतात. त्यानंतर केले तर नुकसान होत नसले तरी त्याचा फार लाभही मिळणार नाही. खरे म्हणजे, जेवनानंतर किंवा काही खाल्ले असेल तर कुठलेही आसन करू नये, प्राणायामही करू नये असे शास्त्र सांगते.
-शशीकुमार भातलवंडे, योग प्रशिक्षक, कळंब.
खाऊन पिऊन योगाचे धडे
४योगशास्त्रानुसार शक्यतो योगाचे धडे हे उपाशीपोटी घ्यावयास पाहिजेत. तरच त्याचा उचीत परिणाम होत असतो.परंतु गुरूवारी शाळांतून दिला जाणारा योगाभ्यास हा उपाशीपोटी ऐवजी भरल्यापोटीच केला जाणार असल्याचे दिसून येत आहे. यातही अनेक शाळांत योगाचे प्रशिक्षण असलेले प्रशिक्षक योग साधक नाहीत. त्यामुळे योगाचा प्रसार केवळ प्रतिकात्मक ठरू नये, यासाठी प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला योग दिवस आयोजित करण्याचे शिक्षण विभागाचे प्रयत्न म्हणजे एक औपचारीकता तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे.