दुष्काळाच्या मागणीसाठी निघाला राकाँचा महामोर्चा
By Admin | Updated: August 7, 2014 23:32 IST2014-08-07T23:00:29+5:302014-08-07T23:32:06+5:30
जिंतूर: जिंतूर, सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी जिंतूर ते परभणी पायी महामोर्चाला ७ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता प्रारंभ झाला.

दुष्काळाच्या मागणीसाठी निघाला राकाँचा महामोर्चा
जिंतूर: जिंतूर, सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी जिंतूर ते परभणी पायी महामोर्चाला ७ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता प्रारंभ झाला. राकाँचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसने या महामोर्चाचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात सापडला आहे. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल. जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या व्यथा शासनासमोर मांडण्यासाठी हा मोर्चा गुरुवारी जिंतूर येथून परभणीकडे मार्गस्थ झाला. शेतकऱ्यांचे पीक कर्जासह शेतीवर आधारित कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ करुन इंजिनिअरिंग, मेडिकल, डी.फार्मसी, बी.फार्मसी, उच्च शिक्षणाचा मावेजा शासनाने भरावा, शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे, खत व औषधाचा मावेजा परत मिळवा. अत्यल्प पावसामुळे फळाबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे फळबागांचा स्वतंत्र सर्व्हे करुन भरपाई अदा करावी, वीज बिल माफ करावे, जनावरांसाठी चारा छावणी उभारावी, पाणी व्यवस्थापनासाठी टँकर सुरु करावे, आदी दहा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. सकाळी ११ वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. या मोर्चामध्ये विजय भांबळे यांच्यासह नानासाहेब राऊत, सुरेश भूमरे, विजयकुमार चौधरी व जिंतूर, सेलू तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)