पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल
By Admin | Updated: June 28, 2014 01:18 IST2014-06-27T23:54:31+5:302014-06-28T01:18:22+5:30
भास्कर लांडे, हिंगोली मराठवाड्यात मान्सूनने हजेरी लावली नसल्यामुळे हिंगोली जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती उद्भवली आहे.

पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल
भास्कर लांडे, हिंगोली
मराठवाड्यात मान्सूनने हजेरी लावली नसल्यामुळे हिंगोली जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती उद्भवली आहे. त्यातच ‘मृगा’प्रमाणे आर्द्रा नक्षत्राची सुरूवात कोरडी झाल्याने मूग आणि उडीदाच्या पिकाची आशा उरलेली नाही. आधीच खत-बियाणांसाठी लाखो रूपये खर्च करून मोकळे झालेले शेतकरी पावसाचा धावा करीत आहेत. विशेषत: हिंगोली तालुक्यातील ९ गावांत दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
मराठवाड्यात ७७९ मिलिमीटर एवढा सरासरी पाऊस पडतो. गतवर्षी आठही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला होता. प्रामुख्याने नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. गतवर्षी या दिवसांत जमिनीच्या बाहेर पाणी निघाले होते. २५ जूनपर्यंत २० टक्के म्हणजे १५९.२९ मिमी पाऊस पडला होता. प्रामुख्याने त्यात २०७ मिमीचा आकडा ओलांडून सर्वाधिक पाऊस हिंगोली जिल्ह्यात पडला होता. गतवर्षी या दिवसांत पावसाचा कहर सुरू असताना यंदा विपरित परिस्थिती निर्माण झाली आहे. मृग नक्षत्राच्या प्रारंभी पावसाचे आगमन झाल्यानंतर यंदा लवकर पेरणी आटोपण्याची आशा उत्पादकांना लागली होती; परंतु यंदा मराठवाड्यात मृगापासून २० दिवसांत केवळ २९.२३ मिमी पाऊस झाला. मृगाच्या प्रारंभानंतर गायब झालेला पाऊस आर्द्रा नक्षत्र सुरू होवून चार दिवस उलटत असतानाही दर्शन देण्याचे नाव घेत नाही. आजपर्यंत १२६.४१ मिमीची अपेक्षित सरासरी असताना पावसाने तिशी ओलांडलेली नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे गतवर्षी पहिल्यांदा २०० मिमीचा टप्पा ओलांडणाऱ्या हिंगोली जिल्ह्याचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. मागील वर्षी पावसाने कहर केला असताना यंदा शेतातील ढेकूळ देखील विरघळले नाही. आजमितीला पडलेल्या २१.९१ मिमी पावसाने उत्पादकांची माती केली. कारण काही गावांत सुरूवातीला पेरलेली पिके आज वाळून जात आहेत. परिणामी जिल्ह्यात अनेक उत्पादकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. याहीपेक्षा विहिरी, बोअर कोरड्या पडण्यास सुरूवात झाली आहे. अनेकांचा चारा संपत आल्याने जनावरांचे पोट पाठीला लागले आहे. व्यापाऱ्यांनी उत्पादकांना उधारी देणे बंद केले आहे. पाण्याअभावी उत्पादकांचे हाल सुरू झाले आहेत. परिणामी मान्सूनच्या पाण्याऐवजी उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.
नऊ गावांमध्ये दुबार पेरणीचे संकट
मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला काही गावांत पाऊस झाल्याने उत्पादकांनी थेट पेरणीला सुरूवात केली होती. त्यात हिंगोली तालुक्यातील आंबाळा-७० टक्के, आंबाळा तांडा-७०, बोंडाळा, वेलूरा, वडद, एकांबा, भिंगी, फाळेगाव, आडगावात अनुक्रमे ४० टक्के पेरण्या झाल्या आहेत; परंतु पावासाने दडी मारल्याने निघालेली पिके वाळण्यास सुरूवात झाली आहे. लाखो रूपये खर्च करून महागामोलाची खत-बियाणे वाया जाण्याची वेळ आली आहे. मृग नक्षत्राच्या पावसावर खेळलेला जुगार उत्पादकांच्या चांगलाच अंगलट आला आहे. परिणामी लाखो रूपयांना बुडाल्याची भावना अंबाळा येथील नामदेव इंगोले, नामदेव लांडगे, नारायण इंगोले, अशोक भिसे, कडुजी इंगोले, भीमा भिसे, धम्मराज सावंत, विलास भिसे, पृथ्वीराज सावंत, झनक भिसे यांनी व्यक्त केली.
मराठवाड्यात जिल्हानिहाय पडलेला पाऊस
जिल्हा सरासरीअपेक्षित पडलेला गतवर्षी पा. औरंगाबाद ६७५.४५११३.९१८.४४१६२.२
जालना ६८८.३२१२०.३६१८.६६१६५.२७
परभणी ७७४.५९१०९.७३३३.४३१३०.५६
हिंगोली ८९२.७६१४६२१.९१२५२.०९
नांदेड ९५५.५५१४२.८६२५.३४१९५.४६
बीड ६६६.६७११०.९६३१.३८१३२.५६
लातूर ८०२.१३१२५.९४५०.६८१२८.९१
उस्मानाबाद ७७६.८३१४१.५२३४.२१०७.४६
एकूण ७७९१२६.४१२९.२३१५९.२९