रबी हंगाम रोगराईच्या विळख्यात !

By Admin | Updated: January 5, 2015 00:36 IST2015-01-05T00:31:21+5:302015-01-05T00:36:34+5:30

उमरगा : तालुक्यात चार-पाच दिवसांपासून वातवरणामध्ये सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे रबीच्या पिकांना फटका बसत असून सुमारे ३५ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत.

Rabi season epidemic! | रबी हंगाम रोगराईच्या विळख्यात !

रबी हंगाम रोगराईच्या विळख्यात !



उमरगा : तालुक्यात चार-पाच दिवसांपासून वातवरणामध्ये सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे रबीच्या पिकांना फटका बसत असून सुमारे ३५ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत.
अख्ख्या पावसाळ्यात तालुक्यात सरासरीच्या अवघा ४४९ मिमी पाऊस झाला. अवेळी झालेल्या पावसामुळे खरीप हंगामही शेतकऱ्याच्या हातचा गेला. अत्यल्प पावसावर सुमारे ३५ हजार हेक्टरवर पेरणी केली. यापैकी १२ हजार हेक्टरवर रबी ज्वारी तर १३ हजार हेक्टरवर हरभऱ्याचे पीक आहे. उर्वरित क्षेत्रात करडई, गहू आदी पिके आहेत. असे असतानाच मागील चार-पाच दिवसांपासून वातावरणामध्ये होत असलेल्या बदलांमुळे पिकांवर आता विविध प्रकारच्या रोगराईचा प्रादुर्भाव होवू लागला आहे. (वार्ताहर)
करडईचे पीक सद्या फुलोऱ्यात आहे. याही पिकावर आता मावा रोग पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पिकाची अपेक्षित वाढ होत नसल्याचे शेतकरी सांगतात. त्याचप्रमाणे काही भागात फुलोऱ्यात आलेल्या करडईची फुले गळू लागली आहेत.
आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण, अधूनमधून पडणारा रिमझिम पाऊस व हवामानातील कमी झालेली उष्णता या एकूणच परिस्थितीचा ज्वारी, गहू, हरभरा, करडई या पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. ज्वारी पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगामुळे ज्वारीची पाने पिवळी पडून वाढ खुंटण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीवर १० लिटर पाण्यात १० मिली रोगर व २ टक्के युरीयाची फवारणी करणे आवश्यक झाले आहे. तसेच हरभऱ्यावर पडणाऱ्या घाटे अळीच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात इकॅलॅक्स २५ मिली व ५ टक्के लिंबुळी आर्क अशी फवारणी करावी. करडई पिकावरील मावा व इतर कीड नियंत्रणासाठी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वेळोवेळी फवारण्या कराव्यात, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी हणमंत गोरे यांनी केले आहे.
ज्वारीवर ‘मावा’
तालुक्यातील मुरुम, आलूर, अचलेर, नारंगवाडी, मुळज, तुरोरी या भागातील शेतकऱ्यांनी प्राधान्याने रबी ज्वारीच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात केल्या आहेत. विंधन विहिरी व साठवण तलावातील उपलब्ध पाण्यावर ज्वारी जोपासली जात असली तरी पाच दिवसांपासून हवामानात बदल झाल्याने ढगाळ वातावरणात धुई पडून पिकांवर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
हरभरा पिकावर ‘घाटे अळी’
उशिराने पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा ज्वारीपेक्षाही जास्त म्हणजेच तब्बल १३ हजार हेक्टवर हरभऱ्याची पेरणी केली. या पिकाची बऱ्यापैकी वाढ झालेली असतानाच ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Rabi season epidemic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.