राष्ट्रवादीच्या प्राबल्यातही सेनेला आघाडी
By Admin | Updated: May 21, 2014 00:49 IST2014-05-21T00:44:47+5:302014-05-21T00:49:26+5:30
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे गणित वेगळे असले तरी पाथरी तालुक्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानामध्ये जि.प. च्या ७५ पैकी ६२ बुथवर शिवसेनेला मताधिक्य मिळाले आहे.

राष्ट्रवादीच्या प्राबल्यातही सेनेला आघाडी
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे गणित वेगळे असले तरी पाथरी तालुक्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानामध्ये जि.प. च्या ७५ पैकी ६२ बुथवर शिवसेनेला मताधिक्य मिळाले आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या चारही गटामध्ये शिवसेनेला आघाडी मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हा विषय चिंतेचा बनला आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत पाथरी तालुक्यात १०२ बुथ आहेत. यामध्ये पाथरी शहरातील २७ मतदान केंद्राचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या बाभळगाव, कासापुरी, हादगाव आणि देवनांद्रा या चार गटामध्ये ७५ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रात जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळाले होते. लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीत मतदारांचा कल हा शिवसेनेकडे अधिक असल्याचे या निवडणुकीच्या निकालावरुन दिसून येत आहे. तालुक्यामध्ये राकाँचे प्राबल्य आहे. असे असतानाही चारही जिल्हा परिषद गटात शिवसेनेला आघाडी मिळाली. हादगाव जि.प.गटात शिवसेनेच्या उमेदवाराला ६ हजार २८५ तर राकाँच्या उमेदवाराल ४ हजार ९१८ मते मिळाली. म्हणजेच या गटात शिवसेनेच्या उमेदवाराला १ हजार ३७० मताधिक्य मिळाले. हादगाव गटातील अनिल नखाते यांच्या हादगाव गावात राकाँच्या उमेदवाराला ३७५ मताधिक्य मिळाले. याच गटात झरी २६, बोरगव्हाण येथे ४७ मतांची लीड मिळाली. या गटातील इतर गावात मात्र शिवसेनेला मताधिक्य राहिले. कासापुरी जि.प. गटात शिवसेनेला ६ हजार ६६० तर राष्ट्रवादीला ३ हजार ७८२ मते मिळाली. म्हणजेच या गटात शिवसेनेला २ हजार ८७८ मतांचे मताधिक्य मिळाले. या गटात केवळ बाणेगाव येथे राकाँला ९१ मतांची लीड मिळाली तर इतर गावात शिवसेनेच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले.बाभळगाव जि.प.गटात शिवसेनेला ५ हजार ७५६ तर राकाँला ४ हजार ७०० मते मिळाली. या गटात १ हजार ५६ मताधिक्य शिवसेनेला मिळाले. या गटात कानसूर २०७, कानसूर तांडा ७५, लिंबा तांडा ९, मुद्गल १८२, विटा ३० या पाच मतदान केंद्रावर राकाँला आघाडी मिळाली. तर इतर गावात शिवसेनेला मताधिक्य राहिले. देवनांद्रा जि.प. गटात ५ हजार ३७३ तर राकाँला ४ हजार २६० मते मिळाली. म्हणजेच या गटात १ हजार ११३ एवढे मताधिक्य शिवसेनेला मिळाले.तर या गटातील राकाँला उमेदवाराला बांधरवाडा ११०, बाबुलतार ६९, जैतापूरवाडी ३९ या तीन गावातच मताधिक्य मिळाले. तर उर्वरित गावामध्ये शिवसेनेला मताधिक्य मिळाले. तालुक्यातील चार गटात झालेल्या मतापैकी ६ हजार ४७७ मतांची आघाडी शिवसेनेच्या उमेदवाराला राहिली आहे. शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या डोंगरगाव ४००, वरखेड ३०२, लोणी ३९०, बाभळगाव ४२९, श्रीरामपूर वस्ती २८८, ढालेगाव २८८, तुरा २२३, पोहेटाकळी २५६, गुंज २४९ या गावांमध्ये शिवसेनेच्या उमेवाराला आघाडी मिळाली. तर जि.प.चे माजी सदस्य एकनाथ घांडगे यांच्या गावातही ४७३ मताधिक्य शिवसेनेला राहिले आहे. ग्रामीण भागातील लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या मताच्या आकडेवारीवरुन या निवडणुकीत मतदारांनी मतदारावर मोदी लाटेचा जास्त प्रभाव झाल्याचे दिसत असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये या मताचे गणित बिघडणार आहे. तर इच्छुकही निवडणुकीतील बिघडलेल्या गणितामुळे अस्वस्थ झाले आहेत. निकाल लागण्यापूर्वी या मतदारसंघात राकाँकडून तिकीटासाठी अनेक जण पुढे येत असताना दिसत होेते. परंतु, निवडणूक निकालानंतर इच्छुकांच्या इच्छेवरही पाणी फिरल्याचे स्पष्ट जाणवू लागले आहे.