अंतरपिकातून घेतले लाखोंचे उत्पादन
By Admin | Updated: December 15, 2014 00:47 IST2014-12-15T00:15:37+5:302014-12-15T00:47:02+5:30
विलास भोसले, पाटोदा दरवाढीने किंवा दर खालावल्याने शेतकरी व ग्राहकांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या कांद्यानेच ऐन दुष्काळात शेतकरी चक्रपाणी जाधव यांना सावरले आहे.

अंतरपिकातून घेतले लाखोंचे उत्पादन
विलास भोसले, पाटोदा
दरवाढीने किंवा दर खालावल्याने शेतकरी व ग्राहकांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या कांद्यानेच ऐन दुष्काळात शेतकरी चक्रपाणी जाधव यांना सावरले आहे.
नैसर्गिक दुष्काळापेक्षा अडाणीपणा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळाला शेतकऱ्याला हालअपेष्टा, मानहानीस तोंड द्यावे लागत आहे. मात्र पाटोदा येथील चक्रपाणी यांनी चिकूच्या बागेत कांद्याचे अंतरपीक घेऊन सुमारे साडेतीन लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे. घरची परिस्थिती व्यवस्थित असतानाही केवळ आवडीपोटी चक्रपाणी यांनी शेती व्यवसायात पदार्पण केले. इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशनची पदविका त्यांनी घेतलेली आहे तर वडील अॅड. लक्ष्मण जाधव हे सभापती म्हणून राहिलेले आहेत. चक्रपाणी जाधव यांनी १९९३ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. मात्र शिकून गुलामगिरीची नोकरी करण्यापेक्षा त्यांनी स्वत: शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले. एक हेक्टर चिकूच्या बागेतच सुमारे १० लाख रुपयांचे उत्पन्न गतवर्षी घेतले आहे. तर यंदा पाणी कमी झाल्याने हाताश न होता ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. चिकूच्या बागेतच अंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली असून, त्यामधून सुमारे साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. गारपिटीमुळे यंदा चिकूची बाग उद्ध्वस्त झाली मात्र धीर न सोडता कांदा उत्पादन घेण्याचे त्यांनी ठरविले व त्यानुसार चिकूच्या बागेत कांद्याचे अंतरपीक घेतले. पिकांना खर्चिक व रासायनिक खाते वापरण्यापेक्षा कंपोस्ट, गांडूळ खताची निर्मिती करुन कांदा पिकाला दिली. तर विहिरीचे पुनर्भरण करुन नियोजनबद्ध पद्धतीने पाणीपुरवठा केला. बेरोजगारांनी नोकरीसाठी प्रयत्न करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीने व्यवसाय केल्यास तो फायद्यात राहील. शेतकऱ्यांनी अडाणीपणा सोडून प्रशासनाच्या योजनंचा लाभ घेण्याचे आवाहन चक्रपाणी जाधव यांनी केले.