विद्यार्थी वाहतुकीचा प्रश्न बिकट
By Admin | Updated: June 15, 2014 00:54 IST2014-06-15T00:47:29+5:302014-06-15T00:54:55+5:30
संतोष हिरेमठ , औरंगाबाद औरंगाबाद : सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्यामुळे मुलांचे गणवेश, वह्या-पुस्तके, दप्तरांसह अन्य शालेय साहित्याच्या खरेदीत पालक व्यग्र आहेत.

विद्यार्थी वाहतुकीचा प्रश्न बिकट
संतोष हिरेमठ , औरंगाबाद
औरंगाबाद : सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्यामुळे मुलांचे गणवेश, वह्या-पुस्तके, दप्तरांसह अन्य शालेय साहित्याच्या खरेदीत पालक व्यग्र आहेत. याबरोबर ते मुलांना शाळेत सोडणाऱ्या रिक्षा, बसचाही शोध घेत आहेत. स्कू ल बस, रिक्षा, व्हॅन, लहान कारसाठी पैसे मोजून पालक मोकळे होतात; परंतु विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर राहील यासाठी पालकांबरोबर शालेय व्यवस्थापन समिती, वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
स्कूल बस, रिक्षांसह लहान कारमधून विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. रिक्षा, व्हॅन, लहान कारमध्ये क्षमतेपेक्षा किती तरी जास्त विद्यार्थ्यांना कोंबून त्यांची ने-आण केली जाते. यातून काही वेळा अपघातही घडले आहेत. पुणे शहरात शाळेतील विद्यार्थिनीवर स्कूल बसचालक आणि मदतनिसाने अत्याचार केल्याची घटना गेल्या फेब्रुवारी महिन्यात उघडकीस आली होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या स्कूल बस नियमांच्या अंमलबजावणीसाठी शाळांमध्ये शालेय परिवहन समिती स्थापन करणे आवश्यक आहे.
स्कू ल बस असो अथवा रिक्षा विद्यार्थ्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न मात्र, वेळोवेळी समोर आलेल्या घटनांमुळे ऐरणीवर येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस, रिक्षा आणि इतर वाहनांची तपासणी करण्याची आवश्यकता आहे.
शहरात जवळपास ७०० स्कूल बस आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्कूल बसला स्पीड गव्हर्नर, विद्यार्थ्यांना दप्तर ठेवण्यासाठी पुरेशी जागा, चढणे आणि उतरणे सोपे जाण्यासाठी जमिनीपासून ठराविक उंचीवर पायऱ्या, अग्निविरोधक यंत्रणा, संकटकालीन मार्ग, बससाठी पिवळा रंग, सीसीटीव्ही कॅमेरे आदींसह स्कूल बसेसमधून विद्यार्थिनी ये-जा करीत असतील, तर त्या बसमध्ये महिला अटेंडंट असणे आवश्यक आहे.
दोन हजार रिक्षा
शहरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या जवळपास दोन हजार रिक्षा आहेत. अनेक शाळा स्कू ल बसची सुविधा देत असल्या तरी त्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात. यामुळे अनेक पालक कमी दर असलेल्या रिक्षांच्या शोधात असतात.रिक्षातून तीन ते चार विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याची परवानगी असताना त्याच्या दुप्पट विद्यार्थ्यांना कोंबले जाते. लहान कार, व्हॅनची क्षमता सात ते आठ विद्यार्थ्यांची असताना जवळपास १५ विद्यार्थ्यांना बसविले जाते. त्यामुळे याबाबत योग्य पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
शहर बससेवा
विविध शाळांच्या मार्गावर एसटी महामंडळाची शहर बससेवा चालविली जाते. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होतो; परंतु बसने विद्यार्थ्यांना पाठवावे, अशी स्थिती प्रत्येक मार्गावर नाही. रस्त्यावर प्रचंड वाहतूक वाढल्यामुळे त्यांना पायी शाळा गाठणे अवघड झाले आहे.
वेगावर नियंत्रण हवे
मुलांना वेळेच्या आत व वेळेवर शाळेत पोहोचविण्यासाठी रिक्षा, व्हॅन गल्लीबोळांतून धावतात. त्यांचा वेग जास्त असतो. अशा वाहनांना नियंत्रण सुटल्यामुळे अपघातही घडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
पालकांनी दक्ष राहावे
नोकरी, व्यवसायामुळे पालकांना मुलांना वेळेत शाळेत पोहोचविता येत नाही. त्यामुळे वाहतूक सुविधेचा पर्याय स्वीकारला जातो; परंतु आपला पाल्य शाळेत कसा जातो, याबाबत पालकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. ज्या वाहनातून विद्यार्थी शाळेत जातो त्यात किती विद्यार्थी बसविले जातात, चालकाचे वर्तन आदींची माहिती पालकांनी घ्यावी.
मुख्याध्यापकांची बैठक
शालेय परिवहन समिती स्थापन करणे प्रत्येक शाळेला बंधनकारक आहे. गेल्या वर्षी याबाबत तीन बैठका घेण्यात आल्या. काही शाळांनी समिती स्थापन न केल्याचे समोर आले होते. यंदाही शाळा सुरू झाल्यावर मुख्याध्यापकांची बैठक घेतली जाणार असून, शालेय परिवहन समितीची माहिती, कामकाज आदी पडताळून पाहिले जाईल.
-नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
स्कूल बसची तपासणी
फिटनेस, सुरक्षिततेच्या नियमांबाबत बहुतांश स्कूल बसची तपासणी करण्यात आलेली आहे. उर्वरित बस आणि नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या स्कूल बसची तपासणी केली जाईल.
-गोविंद सैंदाणे, प्रादेशिक परिवहन अधिकारी
रिक्षावरील कारवाईबाबत बैठक
क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई के ली जाणार आहे; परंतु कारवाई करताना रिक्षांत शाळेचे विद्यार्थी असतात. त्यामुळे कारवाईदरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय होते. त्यामुळे याबाबत लवकरच बैठक घेतली जाणार आहे.
-अजित बोऱ्हाडे, सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक)
सुरक्षेची काळजी
पालकांकडून मिळणारे भाडे कमी असल्यामुळे सहा ते आठ विद्यार्थ्यांना बसविण्यावर भर दिला जातो. अधिक भाडे मिळाल्यास केवळ चार विद्यार्थी बसविता येतील. सुरक्षेच्या दृष्टीने रिक्षांना जाळी बसविली जाते. विद्यार्थी सुरक्षितरीत्या शाळेत आणि घरी पोहोचतील, यासाठी रिक्षाचालक काळजी घेत असतात.
-एस.के. खलील, कार्याध्यक्ष, रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती समिती