वीज बचतीचा बार निघाला फुसका!

By Admin | Updated: June 23, 2014 00:34 IST2014-06-23T00:23:54+5:302014-06-23T00:34:10+5:30

विकास राऊत , औरंगाबाद महापालिकेने २००७ मध्ये नाशिक येथील वीनवॉक सिस्टम्स या संस्थेबरोबर बीओटी तत्त्वावर केलेल्या वीज बचतीच्या कराराचा बार फुसका निघाला आहे.

Power saving bus is leaving the bar! | वीज बचतीचा बार निघाला फुसका!

वीज बचतीचा बार निघाला फुसका!

विकास राऊत , औरंगाबाद
महापालिकेने २००७ मध्ये नाशिक येथील वीनवॉक सिस्टम्स या संस्थेबरोबर बीओटी तत्त्वावर केलेल्या वीज बचतीच्या कराराचा बार फुसका निघाला आहे. ७ वर्षांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर खराब झाल्यामुळे वीज बचत झाली नाही. उलट पालिकेला ७० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.
याशिवाय वीनवॉक बसविलेल्या ‘एनर्जी सेव्हर बल्ब’चा प्रकाश ३० ऐवजी १० फूट अंतरावरच पडत असल्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरील काहीही दिसत नाही. ७० कोटींची रक्कम शहरातील नागरिकांच्या खिशातून गेली आहे. या पैशांतून शहरातील अनेक विकासकामे होऊ शकली असती. मात्र, पालिकेच्या बेलगाम उधळणीमुळे औरंगाबादचे रस्ते अंधारात ढकलले. शहरातील अनेक रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्यामुळे रोज अनेक किरकोळ अपघात होतात.
२१ रोजी झाला भयानक अपघात
काल २१ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आकाशवाणीजवळ पथदिव्यांचा प्रकाश कमी असल्यामुळे ठाणे येथील कारचालकाला दुभाजक दिसले नाही. त्यामुळे कार दुभाजकाला धडकून अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या अपघाताला पथदिव्यांचा प्रकाश हेच मूळ कारण होते. दिव्यांचा प्रकाश लक्समध्ये मोजला जातो. ग्राऊंड लेव्हलपर्यंत पथदिव्यांचा प्रकाश पडत नसल्यास योग्य मीटरमध्ये लक्सचे मापन झालेले नसते.
असा होता करार
वीनवॉकने ७ वर्षे देखभाल करून जुने एचपीएसव्ही बल्ब बदलणे. ७ कोटींत ७ वर्षे काम करणे. वीज बचत करून देणे. इन्फ्र ास्ट्रक्चर निर्माण करून देणे.
पथदिव्यांचा आकडा
28 हजार खांब
40 हजार बल्ब
रस्त्यांची लांबी 1300 कि़मी.
पथदिव्यांतील अंतर 30 फूट

पथदिव्यांसाठी खर्च
वीज बिल - 80 लाख
दरमहा देखभाल, दुरुस्ती- 1 कोटी दरमहा
शहरातील पथदिवे निकृष्ट दर्जाचे
शहरात सर्व मिळून २८ हजार खांब आणि त्यावर ४० हजार दिवे (बल्ब) बसविण्यात आले आहेत. ते पथदिवे वीनवॉक या संस्थेने बसविले असून खराब झाले आहेत. त्यांचा प्रकाश व्यवस्थित पडत नाही. बल्बचे रिफ्लेक्टर खराब झाले आहेत.
२५ कोटींचे इन्फ्रास्ट्रक्चर विकसित न झाल्यामुळे वीज बचत होऊनही नुकसान झाले, असे विद्युत विभागाचे अभियंता पी.आर. बनसोडे यांनी सांगितले. सिडकोचे व सहा प्रभागांतील पथदिव्यांच्या देखभाल, दुरुस्तीचे काम वेगवेगळ्या संस्थांकडे आहे. वीनवॉककडे शहरातील मुख्य रस्त्यांवरील पथदिव्यांचे काम होते.
नवीन संस्थेचा शोध
वीनवॉक या संस्थेबरोबर केलेला ७ वर्षांचा करार संपुष्टात आला आहे. त्यामुळे पालिका नवीन संस्थेच्या शोधात निघाली आहे. पथदिव्यांचे खांब, एलईडी बल्ब, अंडरग्राऊंड केबलिंग, स्वीच बॉक्स आदी प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यासाठी बीओटीवर करार करण्यात येणार आहे. शहरात पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी २५ कोटींचे इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे. बीओटीवर काम करण्यास तयार होणारी कंपनी ते इन्फ्रास्ट्रक्चर बदलून देईल. वीज बचत करणारे बल्ब बसविल्यानंतर त्यातून होणारा फायदा कंत्राटदार कंपनीला उत्पन्न म्हणून मनपा देईल.
आता कोरियन बल्ब
मनपा कोरियन कंपनीने बनविलेले एलईडी बल्ब बसविण्याच्या तयारीत आहे. आयुक्तांचे निवासस्थान, जालना रोड, नेहरू उद्यान, सिद्धार्थ उद्यानात एलईडी बल्ब बसविले असून, त्यांच्या प्रकाशाची चाचपणी सुरू आहे. आयुक्त म्हणाले की, एलईडी बल्ब बसविण्याचा विचार सुरू आहे. दरमहा ५० टक्के वीज बचतीच्या अटीवर निविदेनंतर बीओटीवर करार केला जाईल. क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन, महावीर चौक ते चिकलठाणा या दोन रस्त्यांंना प्राधान्य देण्यात येईल.
असा मोजतात प्रकाश
पथदिव्यांमध्ये बसविण्यात आलेल्या बल्बचा प्रकाश लक्समीटरने मोजला जातो. तज्ज्ञांच्या मते ९ मीटर उंचीवर बल्बचा प्रकाश रस्त्यावरील दोन पथदिव्यांच्या अंतरात दुप्पट पडला पाहिजे. ४ बाय २४ फिटिंगचे बल्ब सध्या शहरातील रस्त्यांवरील पथदिव्यांत आहेत. ९ मीटर उंचीची ती फिटिंग आहे. २५० वॅटची जुनी फिटिंग होती. बल्बचा प्रकाश लक्समीटरने मोजण्याचे धाडस मनपाच्या विद्युत विभागाने आजवर केले नाही. लक्स लेव्हल व वीज बचतही कागदोपत्रीच दाखविण्यात आली.

Web Title: Power saving bus is leaving the bar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.