गरिबांच्या योजना धनिकांच्या घशात
By Admin | Updated: May 30, 2014 01:01 IST2014-05-30T00:41:24+5:302014-05-30T01:01:09+5:30
लालखाँ पठाण , गंगापूर पंचायत समिती स्तरावर दिल्या जाणार्या विविध योजनांमधील साहित्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असून साहित्य हातात येण्याअगोदरच सौदेबाजी होत आहे.

गरिबांच्या योजना धनिकांच्या घशात
लालखाँ पठाण , गंगापूर पंचायत समिती स्तरावर दिल्या जाणार्या विविध योजनांमधील साहित्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असून साहित्य हातात येण्याअगोदरच सौदेबाजी होत आहे. त्यामुळे गरिबांच्या योजनांना लाभ धनाढ्यांना मिळत आहे. पंचायत समितीमध्ये समाजकल्याण, महिला बालकल्याण, कृषी विभाग आदी विविध योजनांमधून लाभधारकांना या योजनेतील साहित्य वाटप करण्यात येते. यात शेती अवजारे, शिलाई मशीन, सायकल, पत्रे, खते, पाईपलाईन, छोटे ट्रॅक्टर मागासवर्गीय व अंपगासाठी कॉम्प्युटर, लॅपटॉप, पिठाची चक्की असे विविध शेती उपयोगी व संसारोपयोगी साहित्यांचे दरवर्षी वाटप करण्यात येते. सदर साहित्य विशिष्ट समाजातील व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबियातील एका व्यक्तीच्या नावे दिले जाते; परंतु हे साहित्य अनेक वेळा अधिकारी, पदाधिकारी व दलाल, ग्रामीण स्तरावरील सरपंच व ग्रामसेवक हे मनमानी करून गरजवंत लाभधारकांना योजनेपासून प्रत्यक्ष लाभापासून वंचित ठेवून तिसर्याच व्यक्तीला लाभ दिल्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांनी अप्रत्यक्षरीत्या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसते. प्रशासनाने मागील दोन वर्षांचा आढावा घेऊन लाभधारकाची चौकशी केली, तर लाभार्थ्यांकडे साहित्य आढळून येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेक वेळा आलेले साहित्य हे लाभार्थ्यांना मंजूर होऊनसुद्धा दिले जात नाही. अशावेळी लाभधारक चकरा मारू न थकतो व पाठपुरावा करण्याचे सोडून देतो. याचा फायदा संबंधित अधिकारी, पदाधिकारी घेतात. ते दलालामार्फत उचलून परस्पर त्या साहित्याची विल्हेवाट लावून आपले चांगभले करून घेत आहेत. (वार्ताहर) साहित्य मिळविण्यात दलाल आघाडीवर पंचायत समितीमध्ये दलालांचा बोलबाला असून गरजवंतांना साहित्य घेण्यासाठी कार्यालयात अनेक अडचणी येतात; मात्र दलालामार्फत होणारे काम तात्काळ केले जाते. तालुक्यातील गंगापूर शहरालगत १५ कि़मी. अंतरावर असलेल्या गावामधील एकाच कुटुंबात नाव बदलून तर काहीचे जातीचे प्रमाणपत्र सुद्धा छायांकित प्रतीवर खाडाखोड करून लाभ घेण्याचे प्रमाण दलालामार्फत वाढले आहेत. याकडे कुणाचेही लक्ष नाही. ‘चिरीमिरी’ दिली तरच फाईल जाते मंजुरीला संबंधित अधिकारी लाभधारकाकडून चिरीमिरी घेतल्याशिवाय फाईल मंजुरीसाठी पाठवतच नाही. अधिकारी व लाभधारक यांची चर्चा पंचायत समिती परिसरात असलेल्या हॉटेल, पानटपर्या येथेच घडून येताना दिसते. गेल्या अनेक वर्षांपासून पंचायत समितीमधील गोडावूनमध्ये अधिक योजनांचे साहित्य धूळखात पडलेले आहे. एकाच ठिकाणी पडलेले साहित्य खर्या लाभधारकापर्यंत का पोहोचू शकले नाही, याचा उलगडा होणे अत्यंत गरजेचे आहे.