पं.दीनदयाळ उद्यान ११ वर्षांपासून बंद
By Admin | Updated: May 16, 2014 00:14 IST2014-05-15T23:16:09+5:302014-05-16T00:14:14+5:30
संजय खाकरे , परळी उन्हाळ्याचे दिवस म्हटले की, मौजमजा, मस्ती, अभ्यास नाही, आई-वडिलांचे ओरडणे नाही.

पं.दीनदयाळ उद्यान ११ वर्षांपासून बंद
संजय खाकरे , परळी उन्हाळ्याचे दिवस म्हटले की, मौजमजा, मस्ती, अभ्यास नाही, आई-वडिलांचे ओरडणे नाही. केवळ मित्रांसोबत दंगा, मस्ती हे सर्व नियोजन असते ते चिमुकल्यांचे. हे नियोजन करताना या चिमुकल्यांच्या मनात मामाच्या गावी गेल्यानंतर बगीचा, उद्यान इ. भागात खेळणे, बागडणे एवढेच असते. परंतु परळी येथे चिमुकल्यांसाठी व वृद्धांना निवांत वेळ घालविण्यासाठी उभारण्यात आलेले पं. दीनदयाळ उद्यानाचे सध्या तीन तेरा झाले असून, या उद्यानाचा वापर नगर परिषदेने पाईप, वीट, रेती आदी साहित्य ठेवण्यासाठी केला आहे. त्यामुळे चिमुकल्यांनी खेळायचे कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. येथील औद्योगिक वसाहतीतील पं. दीनदयाळ उद्यान भुईसपाट झाले आहे. या उद्यानाचा वापर नगर परिषदेचे पाईप ठेवण्यासाठी केला जात आहे. तसेच विटाचे व रेतीचे ढिगारेही साचविण्यात आले आहेत. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, लोखंडी खेळण्या मोडून पडल्या आहेत. या परिसरातील बालकांना व नागरिकांना या उद्यानाचे दरवाजे मागील ११ वर्षांपासून बंदच आहेत. मागील दहा वर्षाच्या काळात अनेक नगराध्यक्ष आले, गेले मात्र याकडे कोणीही जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही. विशेष म्हणजे आताचे नगराध्यक्षही याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. या औद्योगिक वसाहतीत उभारलेल्या उद्यानात पावरलूम, स्नेहनगर, मलिकपुरा, वडार कॉलनी आदी भागातील चिमुकले येथे खेळण्यासाठी येत असतात. हे उद्यान अनेक वर्ष चालले. परंतु मागील ११ वर्षांपासून या उद्यानाची कुठलीही दुरुस्ती करण्यात आली नाही. अगोदरच प्रदूषणामुळे परळीकर त्रस्त असून, त्यातच वृक्षारोपणाची लागवड होत नसल्याने ही परिस्थिती आणखीनच बिकट बनली आहे. या उद्यानात असलेले सौर ऊर्जेचे दिवे तसेच कारंजेही नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. या उद्यानाची दुरुस्ती करुन हे उद्यान चिमुकल्यांसाठी खेळण्या योग्य करावे, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष श्रीकांत पाथरकर, वैजनाथ दहातोंडे, माजी नगरसेवक प्रकाश जोशी यांनी केली आहे. याबाबत नगराध्यक्ष दीपक देशमुख म्हणाले, पं.दीनदयाळ उद्यानाच्या दुरुस्तीसाठी शासनस्तरावर प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न चालू आहेत.