डाळींब, उसाला भीषण आग
By Admin | Updated: May 28, 2014 00:21 IST2014-05-27T23:48:34+5:302014-05-28T00:21:38+5:30
केज/कडा : जिल्ह्यात मंगळवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी डाळींब बाग तसेच उसाच्या फडाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

डाळींब, उसाला भीषण आग
केज/कडा : जिल्ह्यात मंगळवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी डाळींब बाग तसेच उसाच्या फडाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगी मागचे कारण गुलदस्त्यात असून या हानीने शेतकर्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. केज तालुक्यातील साळेगाव येथे खोराडीचे शेत या शिवारातील सर्व्हे नं. ५०८,५०९ मध्ये खय्यूम पठाण, नय्यूम पठाण, शब्बीर मियाँ सय्यद, अजीम पठाण या चार शेतकर्यांचा ऊस आहे. एकूण पाच एकर क्षेत्रावर असलेल्या या उसाच्या फडात ठिबक सिंचनही अंथरलेला होता. मंगळवारी दुपारी २ वाजता फडाने पेट घेतला. त्यानंतर आगीच्या ज्वाला बाहेर पडण्यास सुरूवात झाली. संपूर्ण फड आगीने कवेत घेतला. त्यामुळे उभा ऊस खाक झाला. मंडळ अधिकारी भागवत पवार, तलाठी सुभाष डोरले यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेमुळे या चारही शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक आगीने हिरावून घेतल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पंचनामा केला असून आगीचे कारण स्पष्ट होत नाही. याबाबत वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात येईल. त्यानंतर नुकसान भरपाईच्या बाबतीत तेच ठरवतील असे, मंडळ अधिकारी भागवत पवार यांनी सांगितले. (वार्ताहर) दोन एकर डाळींब बाग खाक आष्टी तालुक्यातील तागडखेल येथील शेतकरी बलभीम रंभाजी गव्हाणे यांनी आपल्या शेतात दोन एकरवर डाळींब लागवड केली होती. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास डाळींबाच्या बागेतून धूर निघण्यास सुरूवात झाली. त्यानंतर परिसरातील शेतकर्यांनी त्यांना याची माहिती दिली. गव्हाणे यांनी तातडीने शेतात धाव घेतली तेव्हा संपूर्ण बाग जळत होती. त्यामुळे आग विझविण्याची संधीही त्यांना मिळाली नाही. त्यांच्या बागेजवळून विद्युत वाहिनी गेलेली आहे. त्यामुळे स्पार्र्कींग होऊन आग लागली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. डाळिंबाच्या झाडाला फळे लगडली होती. अवघ्या वीस दिवसावर तोडणी आली होती. अशा स्थितीत आगीने होत्याचे नव्हते केले. कर्ज काढून त्यांनी बाग जोपासली होती.