सांडपाण्यावर डाळिंबाची बाग
By Admin | Updated: January 20, 2015 01:27 IST2015-01-20T01:12:49+5:302015-01-20T01:27:32+5:30
अंकुश वाघ ,आडूळ दुष्काळाने सर्वत्र शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गावागावात पाण्यासाठी टाहो फोडला जात आहे. मात्र या दुष्काळातही शेती हिरवीगार कशी राहिल,

सांडपाण्यावर डाळिंबाची बाग
अंकुश वाघ ,आडूळ
दुष्काळाने सर्वत्र शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गावागावात पाण्यासाठी टाहो फोडला जात आहे. मात्र या दुष्काळातही शेती हिरवीगार कशी राहिल, याची पुरेपूर काळजी आडूळ येथील युवक शेतकऱ्याने घेतली आहे. आडूळसह परिसरात सध्या भीषण पाणीटंचाई असतानासुद्धा येथील ३४ वर्षीय शेतकऱ्याने पाण्याचे योग्य नियोजन केल्याने गावातून वाहून जाणाऱ्या सांडपाण्यावर साडेतीन एकरात डाळिंबाची बाग फुलविली आहे.
आडूळ बु. येथील मनोज सुभाषराव वाघ या बारावी पास झालेल्या युवा शेतकऱ्याने सध्या पाणीटंचाईची भीषण दाहकता लक्षात घेऊन मागील सहा ते सात वर्षांपासून गावातून वाहून जाणारे सांडपाणी योग्य रीतीने गट क्र. २२ मध्ये असलेल्या ४० बाय ३० शेततळ्यात साठविले. त्यांनी ठिबक सिंचनाद्वारे दररोज झाडांना पाणी देऊन ६२५ डाळिंबाची झाडे, तसेच मोसंबीची कलमे (पन्हेरी) आंतरपीक म्हणून टमाटे जोपासत आहेत.
ग्रामीण भागातील एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या या शेतकऱ्याने शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता प्रमुख व्यवसाय असलेल्या शेती व्यवसायावर भर दिला. त्यांनी आधुनिक पद्धतीने पाणी टंचाईवर मात करून शेततळ्यात साठवलेल्या पाण्याचे काटकसरीने योग्य नियोजन केल्याने शेती सर्वत्र हिरवळीने नटली आहे. शेती व्यवसायाबरोबरच जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायही सुरू केल्याने आर्थिक उत्पन्नातही मोठी भर पडत असल्याचे मनोज वाघ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सध्या दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने झाडांना मल्चिंग करून उन्हाळ्यात कमी पाण्यात झाडे कशी जोपासली जातील, याचे उद्दिष्ट या शेतकऱ्याने डोळ्यांसमोर ठेवले आहे. शेतीकामात आई-वडील, पत्नी, भाऊ यांचे सहकार्य लाभत आहे. एक प्रगतिशील शेतकरी म्हणून मनोज वाघ यांची परिसरात ओळख निर्माण झाली आहे.