पीडितेचा पोलिसांकडूनच छळ!
By Admin | Updated: April 1, 2015 01:04 IST2015-04-01T00:16:37+5:302015-04-01T01:04:22+5:30
औरंगाबाद : बलात्काराची तक्रार देण्यासाठी एका पीडित महिलेने छावणी ठाण्यात आठ दिवस खेट्या मारल्या... तक्रार देण्यासाठी ठाण्यासमोर एक रात्र जागून काढली तरी दया आली नाही.

पीडितेचा पोलिसांकडूनच छळ!
औरंगाबाद : बलात्काराची तक्रार देण्यासाठी एका पीडित महिलेने छावणी ठाण्यात आठ दिवस खेट्या मारल्या... तक्रार देण्यासाठी ठाण्यासमोर एक रात्र जागून काढली तरी दया आली नाही. पोलीस आयुक्तांच्या कानावर हे प्रकरण गेल्यानंतर कोठे हालचाल झाली. महिला अत्याचाराबाबत छावणी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी किती जागरुक आहे, याची प्रचीती या घटनेने पुन्हा एकदा आली.
भावसिंगपुऱ्यातील प्रभातनगर परिसरात राहणाऱ्या तरुणाची ओळख एका तरुणीसोबत झाली होती. हा तरुण वाहनचालक म्हणून काम करतो. दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर दोघांनी गुपचूप नक्षत्रवाडीत भाड्याची खोली घेऊन संसार थाटला. या काळात त्या महिलेला एक मुलगी झाली. त्यानंतर अचानक या तरुणाने संबंध तोडले. तो तिला टाळू लागला. शेवटी या तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला अन् छावणी पोलीस ठाणे गाठले.
आता ‘सेटलमेंट’चा मार्ग
आता मात्र परत हे प्रकरण आयुक्तांपर्यंत गेले तर अडचण होईल, हे लक्षात आल्यानंतर छावणी पोलिसांनी त्या तरुणाच्या आई, वडील व भावांना ठाण्यात
आणले.
मुलगा परराज्यात गेलेला आहे, तो आल्यानंतर आम्ही दोघांचे लग्न लावून देतो, अशी घरच्यांनी छावणी पोलिसांना हमी दिली आहे. तेव्हा पोलिसांनी ‘तक्रार करून कशाला आयुष्याचे वाटोळे करून घेते, त्याला येईपर्यंत वाट पाहा’ असा सल्ला दिला. त्यामुळे मंगळवारीही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. आठ दिवसांपूर्वीच छावणी पोलिसांनी या तरुणीचे म्हणणे ऐकून घेतले असते आणि आयुक्तांच्या आदेशानंतर केलेले प्रयत्न तेव्हाच केले असते तर या पीडितेचा छळ झाला नसता. या घटनेवरून छावणी पोलीस महिला अत्याचाराच्या घटनांबाबत किती गंभीर आहेत, हे स्पष्ट दिसून येते.