पोलीस चौक्या बेवारस
By Admin | Updated: June 23, 2014 00:32 IST2014-06-23T00:14:40+5:302014-06-23T00:32:31+5:30
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या पोलीस चौक्यांवर कर्मचारी थांबतच नसल्याने त्या बेवारस झाल्या आहेत

पोलीस चौक्या बेवारस
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या पोलीस चौक्यांवर कर्मचारी थांबतच नसल्याने त्या बेवारस झाल्या आहेत, तर काही चौक्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धूळखात पडल्या आहेत. त्यामुळे औद्योगिक परिसरात चोऱ्या व लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
महानगराचा वाढता विस्तार पाहता एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस चौकीत कर्मचारी थांबत नसल्यामुळे चौक्या रात्रीच्या वेळी तळीरामांचे आश्रयस्थान बनत चालल्या आहेत. बजाजनगर, सिडको वाळूज महानगर-१, पंढरपूर, रांजणगाव येथे उभारण्यात आलेल्या चारही पोलीस चौक्या बंद आहेत. काही चौक्यांवर पोलीस अधूनमधून काही काळ थांबून निघून जातात. सिडको वाळूज महानगर-१ मधील पोलीस चौकी तर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अनेक दिवसांपासून धूळखात तशीच पडून आहे. या चौकीचा रहिवाशांना काहीच उपयोग होत नाही. त्यामुळेच महानगरात चोऱ्या, लुटमारीचे प्रकार वाढत चालले आहेत.
मोहटादेवी मंदिर, विठ्ठल-रुख्मिणी मंदिर या चौक्यांवर मवाली स्वरूपाच्या तरुणांचा वावर वाढला आहे. पोलीस नसल्याने तरुणांचे टोळके मंदिराच्या परिसरात बसलेल्या, थांबलेल्या महिला- युवतींची छेड काढत असतात. मोहटादेवी मंदिर परिसरात कामाच्या शोधात आलेल्या जळगाव जिल्ह्यातील दाम्पत्याला नुकतेच मारहाण करून लुटले आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील पोलीस चौक्या नावालाच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सिडको वाळूज महानगर-१ मधील पोलीस चौकीच्या आजूबाजूला काटेरी झाडेझुडपे व गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
खिडक्या, टेबल, तुटलेले आहेत. तसेच शेजारीच नागरिक कचरा टाकत असल्याने कचऱ्याचे ढीग साचले आहेत. चौकीवर पोलिसांची ये-जा नसल्याने भुरट्या चोरट्यांचे चांगलेच फावत आहे. या परिसरात चोऱ्या व लुटमारीचे प्रमाण वाढले आहे. औद्योगिक क्षेत्राचा विस्तार वाढला आहे. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे दूर असल्याने नागरिकांच्या छोट्या-मोठ्या तक्रारी सोडविता याव्यात, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी रांजणगाव, बजाजनगर, सिडको वाळूज महानगर-१, पंढरपूर, शेंदुरवादा आदी भागांत पोलीस चौक्यांची उभारणी करण्यात आली; परंतु चौक्याच बेवारस झाल्याने या भागातील नागरिकांना तक्रार देण्यासाठी थेट पोलीस ठाण्यात जावे लागते.