घरकुलाच्या नावाखाली सेनगाव तालुक्यात लूट
By Admin | Updated: August 7, 2014 23:30 IST2014-08-07T23:02:42+5:302014-08-07T23:30:21+5:30
सेनगाव : घरकुलाचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली सेनगाव तालुक्यात एक टोळी सक्रिय झाली आहे.

घरकुलाच्या नावाखाली सेनगाव तालुक्यात लूट
सेनगाव : घरकुलाचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली सेनगाव तालुक्यात एक टोळी सक्रिय झाली आहे. घरकुलाचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत प्रत्येकाकडून पाच हजार रुपये वसूल करीत आहेत. अनेक ग्रामस्थ त्याला बळी पडले आहेत.
नाबार्ड योजनेंतर्गत घरकुलाची स्कीम चालू आहे. राजीव गांधी निवारा योजनेंतर्गत कर्जाऊ घरकुल मिळवून देतो, असे आमिष दाखवणारी पाच जणांची ‘घरकुल टीम’ तालुक्यात सक्रिय झाली आहे. त्यांनी शेकडो ग्रामस्थांकडून लाखो रुपयांची वसूल केली आहे. घरकुलाची कोणतीही योजना अस्तित्वात नसताना ‘नमुना आठसह पाच हजार रुपये द्या, घरकुलाचा लाभ मिळवून देतो’, असे आमिष दाखवून बनवेगिरी केली जात आहे. ही टोळी मागील काही दिवसांपासून तालुक्यातील विविध गावांत फिरत आहे. या भामट्याच्या आमिषाला ग्रामीण भागातील अनेकजण बळी पडले आहेत.
यामुळे गावातील सरपंच, ग्रामसेवकही चक्रावून गेले आहेत. या तथाकथित योजनेची सत्यता तपासण्यासाठी सेनगाव पंचायत समितीतही दररोज अनेक गावांचे ग्रामस्थ येत आहेत; परंतु खातरजमा न करता बळी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. केबीसीनंतर ही टोळी सक्रिय झाल्याने सर्वसामान्यांची आर्थिक लूट होत आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत सामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. त्यात ग्रामीण भागीतील भोळी जनता बळी पडून त्यांची फसवणूक होत आहे. (वार्ताहर)
ग्रामीण भागातील अनेकांना गंडा
घरकुलाच्या नावाखाली फसवणूक झाल्याच्या तोंडी तक्रारी काही ग्रामस्थांनी केल्या आहेत. कोणत्याही आमिषाला बळी पडून जर फसवणूक झाली असेल तर पोलिसात संबंधितांविरूद्ध तक्रार द्यावी.
- डॉ. हरिष दराडे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रूग्णालय औंढा.
आजघडीला नाबार्ड योजनेंतर्गत दोन लाख रुपये अनुदान देणारी घरकुलाची कोणतीही योजना नाही; मात्र राजीव गांधी निवारा भाग- २ ही घरकुल योजना कर्ज स्वरूपात आहे; परंतु त्यासाठी कुणालाही पैसे देण्याची गरज नाही.
घरकुलाचे आमिष दाखवून प्रत्येकी पाच हजार रुपये घेतले असल्याचा तोंडी तक्रारी वाढल्या असताना अद्यापही पोलिसात एकही तक्रार दाखल झालेली नाही.
या प्रकरणी पोलिस व जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन वेळीच सर्वसामान्यांची फसवणूक थांबविण्याची मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.