चालकाच्या मुजोरपणामुळे कळंबचे प्रवासी ताटकळले

By Admin | Updated: February 26, 2017 00:42 IST2017-02-26T00:41:45+5:302017-02-26T00:42:10+5:30

शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील बसस्थानकात शनिवारी दुपारी आलेली लातूर आगाराची बस कळंबला न नेण्याचा पवित्रा चालकाने घेतल्याने काही काळ प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला़

The pilgrims from Kambal were stunned by the driver's guile | चालकाच्या मुजोरपणामुळे कळंबचे प्रवासी ताटकळले

चालकाच्या मुजोरपणामुळे कळंबचे प्रवासी ताटकळले

शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील बसस्थानकात शनिवारी दुपारी आलेली लातूर आगाराची बस कळंबला न नेण्याचा पवित्रा चालकाने घेतल्याने काही काळ प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला़ मोठ्या वादंगानंतर चालकाने बस पुढे कळंबकडे नेली़ या बसस्थानकात अवेळी येणाऱ्या बस आणि बंद झालेल्या काही बसेसमुळे प्रवाशांना तासंतास बसस्थानकात ‘लालपरी’ची वाट पहावी लागते़
शिराढोण येथील बसस्थानकात कळंब डेपोच्या सहा आणि लातूर डेपोच्या पाच गाड्या धावतात. दिवसभरात एकूण ३० फेऱ्या होत असून, याद्वारे विविध मार्गावर वाहतूक करणारे प्रवाशी ये-जा करतात़ शनिवारी कळंबकडे जाण्यासाठी ११ ते ३ वाजेपर्यंत एकही बस आली नाही. या चार तासांच्या दरम्यान शेकडो प्रवासी ताटकळत बसची वाट पाहत होते. वाहतूक नियंत्रकाला प्रवासी बस कधी येणार याची विचारणा करीत होते. वाहतूक नियंत्रक दर अर्ध्यातासाला गाडी आहे़ परंतु आज गाडी आली नाही, येईल वाट पहा असे सांगत होते. प्रवाशांमध्ये शाळेतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांची संख्या मोठी होती. दुपारी अडीच वाजता लातूर डेपोची बस शिराढोण बसस्थानकात आली. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला़ मात्र, त्या गाडीच्या चालकाने बस परत लातूरला जाणार आहे, असे वाहतूक नियंत्रकांना सांगितल्यावर प्रवाशांनी गोंधळ घातला. वाहतूक नियंत्रकांनी ११ वाजल्यापासून कळंबला गाडी गेलेली नाही असे सांगितल्यानंतरही चालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. वाहतूक नियंत्रकांनी आगार व्यवस्थापकांशी मोबाईलवरून संपर्क करून परिस्थिती कळविली. यावर कळंबच्या अगार व्यवस्थापकांनीही बसगाडी कळंबला पाठवा असे सांगितले. वाहतूक नियंत्रकांनी चालकाला बस कळंबला नेण्याबाबत लेखी दिले; तरीही लातूर डेपोचे चालक ‘मी लातूरला परत जाणार आहे’, याच भूमिकेवर ठाम होते. यामुळे प्रवासी, वाहतूक नियंत्रक व चालक यांच्यात जवळपास ३० मिनिटे गोंधळ सुरू होता. त्यानंतर चालकाने बस पुढे कळंबकडे नेली़ विशेष म्हणजे, यानंतर अवघ्या दहा मिनिटात एका पाठोपाठ एक अशा आणखी दोन गाड्या कळंबकडे जाण्यासाठी या स्थानकात दाखल झाल्या. सकाळी ११ पासून ३ वाजेपर्यंत कळंबकडे जाण्यासाठी एकही गाडी आली नाही़ परंतु तब्बल चार तासानंतर १५ मिनिटात एकापाठोपाठ एक अशा तीन गाड्या कळंबकडे धावल्या. अनियमित येणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांना मात्र, गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़ तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन वेळेवर बसेस सोडाव्यात, अशी मागणी होत आहे़

Web Title: The pilgrims from Kambal were stunned by the driver's guile