‘युपीएससी’चे शिखर पहिल्याच प्रयत्नात पादाक्रांत
By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T00:13:12+5:302014-06-14T01:20:23+5:30
उस्मानाबाद : प्राथमिक, माध्यमिक शिक्षण उस्मानाबाद येथे पूर्ण केल्यानंतर ‘एमबीबीएस’ चा अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या अनुषंगाने मुंबई येथे गेलेल्या रविराज खोगरेला
‘युपीएससी’चे शिखर पहिल्याच प्रयत्नात पादाक्रांत
उस्मानाबाद : प्राथमिक, माध्यमिक शिक्षण उस्मानाबाद येथे पूर्ण केल्यानंतर ‘एमबीबीएस’ चा अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या अनुषंगाने मुंबई येथे गेलेल्या रविराज खोगरेला लोकसेवा आयोगाच्या परीक्षेने खुनावले. त्यानंतर खोगरे यांनी जमेल त्या पद्धतीने आणि वेळ मिळेल तेंव्हा तयारीला सुरुवात केली. कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर खोगरे यांनी पहिल्याच प्रयत्नात ‘युपीएससी’चे शिखर पादाक्रांत केले आहे. या यशानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यांचे वडील येथील भोसले हायस्कुलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत.
रविराज खोगरे हे तसे सर्वसामान्य कुटुंबातीलच. वडील शाहुराज खोगरे हे भोसले हायस्कुलवर मुख्याध्यापक होते. त्यावेळी रविराजचे १२ वी पर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर रविराज यांनी एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी नवी मुंबई येथील तेरणा वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश घेतला. हा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत त्यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारीही सुरु केलेली होती. त्यानंतर २०१२ पासून मात्र त्यांनी या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. हळुहळु अभ्यासाची वेळी वाढविली. मात्र अभ्यास करताना परीक्षा द्यायची आहे म्हणून अभ्यास न करता आपणाला काहीतरी शिकायचे आहे, असे गृहीत धरुन अभ्यास करीत गेलो. पुस्तकी अभ्यासासोबतच या क्षेत्रातील मार्गदर्शक यशस्वी झालेले व्यक्ती आणि वृत्तपत्र वाचनावरही तितकाच भर दिला. मुख्य परीक्षेची तयारी करताना दिवसातून किमान ६ ते ८ तास वेळ अभ्यासासाठी दिला असे रविराज यांनी सांगितले. खोगरे हे पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले असून, १ हजार १२२ विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा ६७३ वा क्रमांक आहे. (प्रतिनिधी)
अभ्यासाकडे एन्जॉय म्हणून पाहिले
मुख्य परीक्षेची तयारी करताना कधीही ताण घेवून अभ्यास केला नाही. अभ्यासाकडे एन्जॉय म्हणून पाहिले. हेच आपल्या यशाचे गमक असल्याचे रविराजने आवर्जून सांगितले. स्पर्धा परीक्षाची तयारी करताना विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकात अडकून न राहता वेगवेगळ्या स्त्रोतांच्या माध्यमातून माहिती गोळा केल्यास तयारी अधिक सोपी होते, असा सल्लाही त्यांनी दिला. आपला प्रशासकीय सेवेत जाण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.