उच्चांकी तापमानात मशागतीची लगबग
By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T00:16:58+5:302014-06-14T01:20:23+5:30
बालाजी थेटे, औराद शहाजानी जून महिना निम्मा संपत आला़ मृग नक्षत्र लागला पण अद्याप मृगाच्या पावसाने हजेरी लावलेली नाही़ उलट जून महिन्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत

उच्चांकी तापमानात मशागतीची लगबग
बालाजी थेटे, औराद शहाजानी
जून महिना निम्मा संपत आला़ मृग नक्षत्र लागला पण अद्याप मृगाच्या पावसाने हजेरी लावलेली नाही़ उलट जून महिन्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत चालली आहे़ यामुळे यावर्षी मृगाची पेरणी होते की नाही, अशी परिस्थिती झाली आहे़ दरम्यान, कोल्हापुरी पाटबंधाऱ्यात उपलब्ध असलेला पाणीसाठा कर्नाटकात सोडला जात आहे़ यंदा जून महिन्यात तापमानाचा उच्चांक झाला आहे़
शेतकऱ्यांचे आर्थिक वर्ष सुरु होते ते जून महिन्यात शेतकरी आपल्या वर्षाची पुंजी शेतात पेरणी रूपाने करत असतो़ यावर्षी १३ जून आला तरी अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही़ शेतकरी शेतीची मशागत करून पेरणीसाठी आभाळाकडे डोळे लावून वटारून बघत आहेत़ शेतकरी चिंतामुक्त झाला आहे़ गेल्या वर्षी मृगाची पेरणी झाली होती, यावर्षी होईल की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे़ पाऊस नाही उलट तापमान दिवसेंदिवस मे महिन्यासारखे वाटत आहे़ माणसं, जनावरे यांच्या अंगाची लाहीलाही होत आहे़ जून महिन्यात तापमान हे २५ ते ३० अंशापर्यंत राहते़ पण यावर्षी हे तापमान ४० ते ३५ अंशापर्यंत वाढले आहे़ विशेष म्हणजे पाण्याचे तापमान २० ते २५ पर्यंत राहते़ पण जून महिन्यात पाण्याचे तापमान ३७ ते ३८ अंशापर्यंत वाढलेले आहे़
परिणामी पाण्याचे बाष्पीभवन याचे प्रमाण वाढते आहे़ यावर्षी झालेल्या उन्हाळ्यात सतत अवकाळी पाऊस पडत गेला़ जानेवारी २०१४ सोडला तर फेब्रुवारी २०१४ ला २३़८, मार्च महिन्या ३९़४, मे महिन्यात ४१़८ असा उन्हाळ्यात अवकाळी पाऊस पडला़ यामुळे मृगाच्या पावसावर परिणाम झाला आहे़ शेतीच्या उत्पादनावरही याचा परिणाम होणारा दिसत आहे़ जमिनी तापल्या नाहीत अन् उलट जून महिन्यात तापमान वाढत असल्याने वातावरणात थंडी, हवा निर्माण होण्याचा हा कालावधी पण उलट गर्मी वाढली आहे़ परिणामी पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे़ पाणीटंचाई निर्माण होत आहे़ पाणीपातळी खोलवर गेली आहे़ जून २०१३ व जून २०१४ या दोन वर्षातील हवामान, पर्जन्यमान, तापमान यातील तफावत मोठी आहे़
वाळूसाठी पाणी सोडल्याची चर्चा़़़
तेरणा नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्यातील साठलेले लाखो लिटर्स पाणी प्रशासनाने शुक्रवारी सोडून दिले़ औराद शहाजानी ग्रामस्थ व शेतकऱ्यांचा विरोध असतानाही प्रशासनाने पाणी सोडून दिले आहे़ अजून एकही मोठा पाऊस झालेला नसताना प्रशासनाने पाणी सोडण्याची केलेली घाईची चर्चा गावात रंगली आहे़
जलसिंचन विभागाने पाणी सोडू नये, अशी मागणी औराद शहाजानी, तगरखेडा व परिसरातील अन्य ग्रामपंचायतींनी केली होती़ तेरणा नदीवरील औराद, वांजरखेडा, सोनखेड, तरगखेडा, मदनसुरी येथील कोल्हापुरी बंधाऱ्यातील मुबलक पाणीसाठा सोडून देण्यात आला आहे़ प्रशासनाने किमान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल, अशा पध्दतीने पाणी सोडायला हवे होते, अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे़
दरम्यान, जलचिंन विभागाकडे पाणी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आल्यावर पाणीसाठा शिल्लक ठेवण्यात आला नाही़ तेरणा नदीपात्रत्तत वाळूचे प्रमाण अधिक आहे़ वाळूमाफियांची मर्जी सांभाळण्यासाठी पाणी सोडून देण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली आहे़