‘शिवनेरी’ चा मार्ग दुर्गम
By Admin | Updated: June 12, 2014 01:33 IST2014-06-12T01:14:42+5:302014-06-12T01:33:32+5:30
औरंगाबाद : प्रवाशांचा भरपूर प्रतिसाद असतानाही एसटी महामंडळाच्या अनास्थेमुळे औरंगाबादहून पुण्याकडे सध्या १२ पैकी केवळ ९ ‘शिवनेरी’ बस धावत आहेत.

‘शिवनेरी’ चा मार्ग दुर्गम
औरंगाबाद : प्रवाशांचा भरपूर प्रतिसाद असतानाही एसटी महामंडळाच्या अनास्थेमुळे औरंगाबादहून पुण्याकडे सध्या १२ पैकी केवळ ९ ‘शिवनेरी’ बस धावत आहेत. त्यातच पुन्हा दररोज ४ ते ५ फेऱ्या रद्द होत असल्याने रद्द झालेल्या या फेऱ्या खाजगी ट्रॅव्हल्ससाठी संधी निर्माण करून देण्याचाच प्रकार असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी बसच्या वारंवार रद्द होणाऱ्या फेऱ्यांमुळे महामंडळाचे अधिकारी औरंगाबाद आगाराच्या उत्पन्नावर पाणी सोडत आहेत.
औरंगाबाद- पुणे मार्गावर महामंडळाने खासगी एजन्सीमार्फत शिवनेरी बससेवा सुरू केली. पुणे- औरंगाबाद मार्गावर सहा आणि औरंगाबाद- पुणे मार्गावर सहा शिवनेरी बस चालविण्यात येत होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वीच दोन शिवनेरी बसची मुदत संपल्याने त्या बंद पडल्या.
दहा बसद्वारे शिवनेरीची सेवा सुरू असताना बसच्या नादुरुस्तीमुळे फेऱ्या रद्द होण्याचे प्रकार गेल्या महिनाभरात वाढल्याने प्रवाशांना अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागले. मागील आठवड्यात एक बस अपघातामुळे बंद पडली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दररोज फेऱ्या रद्द होण्याचा प्रकार सुरू आहे. पंचपक्वान्न दिले मात्र ते येथील एसटीच्या अधिकाऱ्यांना खाता येत नसल्याची स्थिती आहे.
प्रवाशांना परत केले पैसे
पुण्याहून- औरंगाबादकडे निघालेली शिवनेरी बस नादुरुस्त झाल्याने ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना उकाड्याचा त्रास सहन करीत येथे यावे लागले.
१३ मे रोजी हा प्रकार घडल्यानंतर एसटी प्रशासनाने दुसरी शिवनेरी बस उपलब्ध करून न देता नगरपर्यंत साध्या बसमधून प्रवास करायला भाग पाडल्याबद्दल काही प्रवाशांनी १४ मे रोजी मध्यवर्ती बसस्थानकात नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रवाशांना पैसे परत करण्यात आले होते.
प्रवासी-कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची
४ मध्यवर्ती बसस्थानकात २५ मे रोजी दुपारी १ वाजता पुण्याला जाणारी शिवनेरी बस अचानक रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.
४ अचानक बस रद्द झाल्याने प्रवासी आणि स्थानकावरील चालक- वाहक, कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली.
४ जवळपास तासाभरानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास या प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली.
नियोजनाकडे दुर्लक्ष
सर्वाधिक उत्पन्न देणारी बस म्हणून शिवनेरीकडे पाहिले जाते. त्यामुळे कंत्राट रद्द होण्यापूर्वी दोन बसचे नव्याने कंत्राट करण्याची आवश्यकता होती. तसेच बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी होईल, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहता वेळीच नियोजन करण्याची गरज होती; परंतु याकडे कानाडोळा केला गेला. ‘शिवनेरी’ बससेवा बंद पाडण्याचा कट आखला गेला आहे की काय, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
वरिष्ठ पातळीवर निर्णय
शिवनेरी बसच्या कंत्राटाबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होत असतो. अपघातग्रस्त झालेली बस आगामी दोन दिवसांत दाखल होईल. तसेच लवकरच नाशिक अथवा मुंबई मार्गावरील एक शिवनेरी बस मिळणार आहे, अशी माहिती मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) प्रताप जाधव यांनी दिली.
बुधवारी चार फेऱ्या रद्द
बुधवारी सकाळी ८, १० सायंकाळी ५ आणि रात्री ८ वाजेच्या शिवनेरीच्या फेऱ्या रद्द झाल्याची सूचना मध्यवर्ती बसस्थानकात लावण्यात आली होती. बहुतांश प्रवासी सकाळी आणि सायंकाळी प्रवास करण्यास प्राधान्य देतात. मात्र, याच वेळेतील फेऱ्या रद्द होत असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे दिसत आहे.