'ऑपरेशन टायगर' हे सत्ताधाऱ्यांचे दिवास्वप्न; अंबादास दानवे यांचा शिंदेसेनेवर जोरदार पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 18:22 IST2026-04-10T18:20:12+5:302026-04-10T18:22:14+5:30
"सगळे खासदार एकत्र कसे भेटू शकतात?" अंबादास दानवेंनी उडवून लावल्या चर्चा

'ऑपरेशन टायगर' हे सत्ताधाऱ्यांचे दिवास्वप्न; अंबादास दानवे यांचा शिंदेसेनेवर जोरदार पलटवार
छत्रपती संभाजीनगर: उद्धवसेनेचे खासदार शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याच्या 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चा केवळ अफवा असून, हे सत्ताधाऱ्यांचे दिवास्वप्न आहे, अशी टीका विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी केली. शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राजकीय घडामोडींसह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. "फोनवर बोलणे म्हणजे भेटी नव्हेत, आमचे सर्व खासदार भक्कम आहेत," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिक्षकांचे पगार रखडल्यावरून टीका
राज्यातील शिक्षकांचे पगार रखडल्याबद्दल बोलताना दानवे म्हणाले की, "लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद नसताना ती राबवली जात आहे. मोठ्या अधिकाऱ्यांचे पगार न थांबवता केवळ शिक्षकांचे पगार थांबवणे हे चुकीचे आहे. उच्च न्यायालयानेही या योजनेवर ताशेरे ओढले आहेत." शिंदे गटाला भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असून, स्वतःचे महत्त्व दाखवण्यासाठी ते अशा वावड्या उठवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
करमाड हत्या प्रकरणावरून पोलिसांना घेरले
करमाड येथील पेट्रोल पंपावर झालेल्या महिलेच्या निर्घृण हत्येचा संदर्भ देत दानवे यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले. "संबंधित महिलेने तीन वेळा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. हत्येच्या दिवशीही ती तीन तास ठाण्यात बसून होती, मात्र पोलिसांनी तिची दखल घेतली नाही. या खुनाला पोलीसच जबाबदार असून, संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी," अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षक आणि महासंचालकांकडे केली आहे.