शहराच्या दिमतीला केवळ २१ शहर बस
By Admin | Updated: May 31, 2014 01:24 IST2014-05-31T01:10:34+5:302014-05-31T01:24:06+5:30
साहेबराव हिवराळे, औरंगाबाद मेट्रोसिटीकडे वाटचाल करणार्या औरंगाबाद शहरांतर्गत वाहतुकीची जबाबदारी फक्त २१ शहर बसवर अवलंबून असून,
शहराच्या दिमतीला केवळ २१ शहर बस
साहेबराव हिवराळे, औरंगाबाद मेट्रोसिटीकडे वाटचाल करणार्या औरंगाबाद शहरांतर्गत वाहतुकीची जबाबदारी फक्त २१ शहर बसवर अवलंबून असून, सिडको स्थानकातून वाळूज, चिकलठाणा आणि औरंगपुरा, रेल्वेस्टेशन वगळता इतर भागांत शहर बस फिरकताना दिसत नाहीत. खाजगी वाहनांच्या भरवशावरच प्रवाशांना अवलंबून राहावे लागत आहे. मुंबई, पुणे या ठिकाणी प्रवाशांची प्रचंड वर्दळ आहे. त्याखालोखाल औरंगाबादेतही वर्दळ वाढती आहे. येथे जागतिक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या अजिंठा, वेरूळ लेण्या, दौलताबाद किल्ला, मकबरा, पाणचक्की व शहराचा दर्जा वाढविणारे मॉल, सिनेमा थिएटर्स, कारखाने आहेत. पर्यटक शहरात आकर्षिले जात आहेत; परंतु येथील शहर वाहतूक सेवा अत्यंत तोकडी असल्याने खाजगी वाहनांनी प्रवास करण्याशिवाय सामान्य नागरिकांना पर्यायच उरत नाही. याविषयी शहरातील कामगार, पालक, नागरिकांत तीव्र नाराजीचा सूर आहे. रिंगरूट बससेवा हवी दहा वर्षांपूर्वी चिकलठाणा ते रेल्वेस्टेशन, बाबा पेट्रोल पंप ते सिडको हडको, पुन्हा चिकलठाणा अशी रिंगरूट बससेवा चालू होती. शाळकरी मुलांपासून ते नोकरवर्गासह सामान्य व्यक्तीही जेमतेम पैशांत दररोज शहरभर फिरत होते; परंतु आता खाजगी वाहनांचा आर्थिक भुर्दंड सहन करीत प्रवास करण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. -राजू साबळे सामान्यांचा विचार व्हावा सामान्य कामगारांना खाजगी वाहनाने ये-जा करणे परवडत नाही. शहर बसची संख्या वाढविल्यास प्रवाशांच्या खिशाला आर्थिक झळ कमी बसेल. खेड्यातून शहरात येणार्या नातेवाईकांना तुम्ही शहर बसने सरळ घरी या, असे म्हणताच येत नाही. कारण रस्त्यावर बसेसची संख्या अंत्यंत कमी आहे. -किशोर जाधव याविषयी एसटी महामंडळाचे अधिकारी सुपेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सध्या ज्या बस सुरू आहेत, त्यात काही बदल नाही, शाळा व कामगारांचा आम्ही अजून विचार केलेला नाही. सतत मागणी होत असली तरी सातारा, शेंद्र्यासाठी किंवा रिंगरूट बससेवेविषयीही वरिष्ठांच्या होकाराशिवाय काही नियोजनच नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मजुरांची होतेय गैरसोय हंगामी मजुराला वाळूज, पडेगाव, शेंद्रा तसेच सातारा इत्यादी भागात कामासाठी जावे लागते, त्यांना खाजगी वाहनाने ये-जा करावी लागते. प्रवासासाठी ठेकेदाराला दररोज अधिकचे पैसे द्यावेच लागतात किंवा खाजगी वाहनने त्यांची दररोज ने-आण करावी लागते. झपाट्याने वाढणार्या शहराला शहर बसच्या जाळ्याने का जोडले जात नाही. -अण्णासाहेब खरात