टँकरची संख्या ११ ने घटली
By Admin | Updated: August 4, 2014 01:57 IST2014-08-04T00:59:36+5:302014-08-04T01:57:29+5:30
औरंगाबाद : पावसाळ्यातही सातत्याने वर चढत असलेला पाणीपुरवठ्याच्या टँकरचा आलेख आता खाली येण्यास सुरुवात झाली आहे.

टँकरची संख्या ११ ने घटली
जिल्ह्यातील टँकरची संख्या चालू आठवड्यात ११ ने कमी होऊन ३२२ वर आली आहे. सिल्लोड तालुक्यातील काही भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तेथील टँकर कमी करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात यंदा जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे प्रशासनाने तेव्हापासून टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला.
मे अखेरीस वाढली टंचाईग्रस्त गावांची संख्या
मेअखेरीस टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढल्यामुळे टँकरची संख्याही दोनशेवर पोहोचली. जून महिन्यात पाऊस पडल्यानंतर ही संख्या कमी होणे अपेक्षित होते. मात्र, पावसाने दडी मारल्यामुळे पाणीटंचाई परिस्थिती आणखी गंभीर झाली. त्यामुळे मागील आठवड्यापर्यंत दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढतच होती.
जुलैअखेरीस टँकरची संख्या ३३३ वर पोहोचली होती. मात्र, आता चालू आठवड्यात ही संख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत सिल्लोड तालुक्यातील अंभईसह काही मंडळांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे प्रशासनाने या भागातील ११ टँकर कमी केले आहेत. परिणामी चालू आठवड्यात टँकरची संख्या ३२२ पर्यंत खाली आली आहे.