आता महामार्गावर राहुट्या
By Admin | Updated: December 14, 2014 00:05 IST2014-12-13T23:44:45+5:302014-12-14T00:05:17+5:30
मानदेऊळगाव : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती वाढत आहे. परिणामी भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. या चोऱ्यांवर नियंत्रण रहावे यासाठी चोऱ्या व लुटमारी

आता महामार्गावर राहुट्या
मानदेऊळगाव : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती वाढत आहे. परिणामी भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. या चोऱ्यांवर नियंत्रण रहावे यासाठी चोऱ्या व लुटमारी रोखण्यासाठी जालना - राजूर महामार्गावर गस्तीसाठी पोलिसांच्या राहुट्या उभारणार असल्याची माहिती चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली.
पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्या आदेशानुसार या मार्गावर राहुट्या उभारणार आहेत. यात प्रामुख्याने पीरपिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, माळशेंद्रा फाटा येथे राहुटी उभारण्यासाठी येथील जागेची पाहणी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी या रस्त्यावर ट्रकवर गोळीबार झाल्याची घटनाही ताजी आहे.
माळशेंद्रा फाटा येथे पोलिस राहुटी उभारणार आहेत. माळशेंद्रा, वंझार उम्रद, गोंदेगाव हा मधला मार्ग थेट महामहामार्गाला मिळतो. या महामार्गावरील लूटमार अथवा इतर गुन्हेगारी आटोक्यात येण्यास मदत होणार आहे.
याविषयी परिसरातील रहिवासी तसेच भीमकायदा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विलास डोळसे म्हणाले, ग्रामसंरक्षक दलाची स्थापना करुन सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी परिसरातील पोलिस पाटील बावणे, गणेश शेवाळे, संजय डोळसे, शरद डोळसे, संतोष लहाने आदींची उपस्थिती होती.या मार्गावर राहुट्या उभाराव्यात अशी परिसरातील ग्रामस्थांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. ही मागणी तसेच दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता या राहुट्या उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. राहुट्यांमध्ये शस्त्रधारी चार ते पाच पोलिसांची गस्त असणार आहे. वाटमारीचे प्रकारही यामुळे थांबण्यास मदत मिळणार आहे.
दरम्यान, देऊळगावराजा महामार्गासह जिल्ह्यातील इतर महामार्गावरही राहुट्या उभारणीचे काम पोलिस दलाने हाती घ्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. विशेषत: जालना ते नांदेड व जालना ते बीड महामार्गावर राहुट्या उभारण्याची नितांत गरज असल्याचे मत परिसरातील अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. (वार्ताहर)४
मानदेऊळगाव परिसरात उभारण्यात येणाऱ्या पोलिस राहुट्यांची पाहणी चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी केली. साधारणपणे दोन ते तीन ठिकाणी राहुट्या उभारल्या जातील, अंदाज त्यांनी व्यक्त केला. यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण राहील.