आता तलाठ्यांवर एसडीएम कारवाई प्रस्तावित करणार; जिल्हाधिकारी घेणार अंतिम निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 12:34 IST2025-05-30T12:32:09+5:302025-05-30T12:34:30+5:30
झीरो तलाठ्यांचे वर्चस्व संपुष्टात आणा, त्यांच्याबाबत तक्रारी आल्यानंतर थेट तलाठ्यांवरच निलंबनाची कारवाई

आता तलाठ्यांवर एसडीएम कारवाई प्रस्तावित करणार; जिल्हाधिकारी घेणार अंतिम निर्णय
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील मंडळ अधिकारी, तलाठ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव आता उपविभागीय अधिकारी (एसडीएम) जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतील. त्यावर जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेतील. तसेच झीरो तलाठ्यांचे वर्चस्व संपुष्टात आणा, त्यांच्याबाबत तक्रारी आल्यानंतर थेट तलाठ्यांवरच निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गुरुवारी विभागप्रमुखांच्या बैठकीत दिला. महसूल प्रशासन लाचखोरीमुळे बदनाम होत चालले आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता येण्यासाठी जिल्हाधिकारी स्वामी यांनी गुरुवारी महत्त्वाचे अलर्ट यंत्रणेला दिले आहेत.
बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना फैलावर घेतले. १० जूनपर्यंत सर्व प्रलंबित फेरफार निकाली काढा. झीरो पेंडन्सीचे प्रमाणपत्र संबंधितांकडून विभागप्रमुखांनी घ्यावे. प्रत्येक कार्यालयात तक्रारपेटी लावण्यात यावी. ३ जूनपर्यंत पेट्या लागल्या पाहिजेत. दर सोमवारी एसडीएमने व्हिडीओ शूटिंग करत, (इन कॅमेरा) ती कुलूप बंद पेटी उघडून तक्रारी निकाली काढाव्यात. जिल्हाधिकाऱ्यांकडे तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाईचे अधिकार असल्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांना कारवाई करता येत नाही, असे परखड मत उपविभागीय अधिकाऱ्यांनी बैठकीत मांडले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडील कारवाई प्रस्तावित करण्याचे अधिकार आता एसडीएमकडे वर्ग करण्यात आले आहेत. बदल्या समुपदेशनाने करण्यात येतील. दरमहा एक तारखेला तक्रार निवारण दिन आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
...तर निलंबन अटळ समजा
कुणाच्याही कार्यालयात खासगी व्यक्ती दिसली तर सामान्यांनी तक्रारी कराव्यात. जिल्ह्यात कुणाच्या कार्यालयात खासगी व्यक्ती आढळून आली तर कारवाई होईल. तसेच विशेषत: तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात खासगी व्यक्ती दिसली, ते सामान्यांना उद्धटपणे बोलत असतील, अशा तक्रारी आल्यास तलाठी, मंडळ अधिकारी निलंबित होतील.
- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी