मोरांची नव्हे; रिकामटेकड्यांची बाग
By Admin | Updated: June 23, 2014 00:32 IST2014-06-23T00:12:53+5:302014-06-23T00:32:07+5:30
गजानन दिवाण , औरंगाबाद मोठ्या संख्येने आणि पिसारा फुलवून नाचणारे मोर भेटणे, ही ऐतिहासिक हिमायत बागेची एक मोठी ओळख.

मोरांची नव्हे; रिकामटेकड्यांची बाग
गजानन दिवाण , औरंगाबाद
मोठ्या संख्येने आणि पिसारा फुलवून नाचणारे मोर भेटणे, ही ऐतिहासिक हिमायत बागेची एक मोठी ओळख. या सरावलेल्या मोरांना माणसांचे सुरक्षित अंतर काहीच अडचणीचे वाटायचे नाही. त्यामुळे मुक्त वातावरणात ते आपले नैसर्गिक जीवन जगायचे. आता रिकामटेकड्या माणसांनी आपली वाट वाकडी केली. कोणी हौसी फोटोंसाठी, कोणी मुलांना जवळून मोरांचा नाच दाखविण्यासाठी, तर कोणी विनाकारण या मोरांचा पाठलाग करू लागले. त्यामुळे मोरांचे जगणे कठीण झाले.
साधारण सहा वर्षांपूर्वी येथे ३५० मोर-लांडोर होते, असे सांगितले जाते. आज ही संख्या पन्नाशीच्या घरात आल्याचा दावा पक्षीनिरीक्षक किशोर पाठक यांनी केला. प्रत्येक पक्षी-प्राण्याचे कार्यक्षेत्र ठरलेले असते. त्याच परिसरात ते भेटतात. अशाच मोरांच्या कार्यक्षेत्रांना सकाळी ७ वाजता दोन तास भेट दिली तेव्हा केवळ २३ मोर आढळले. मोरांच्या मीलनाचा हाच काळ. मोर पिसारा फुलवून नृत्य करीत लांडोरला आकर्षित करीत असतो. असे पिसारा फुलवून नाचणारे दोन मोर भेटले. ज्या खुरट्या झुडपात ते अंडे घालतात, त्या क्षेत्राची कटाई करण्यात आली आहे. आता येथे फळबाग फुलविली जाणार असल्याचे सांगण्यात आले. अशा झुडपांमध्ये अंडी घालणाऱ्या मोरांना दाट किंवा फारसे उंच गवतदेखील चालत नाही. मग ही अंडी कधी रिकामटेकड्या माणसांच्या, तर कधी भटक्या कुत्र्यांच्या नजरेस पडतात आणि जन्मण्यापूर्वीच मोराचा बळी जातो. याच कारणातून गेल्या काही वर्षांत हिमायत बागेत मोर जन्माला येण्याची गती मंदावल्याची भीती पाठक यांनी व्यक्त केली. कमी वयाचा एकही मोर दिसत नसल्याचा दाखला त्यांनी दिला. दोन तासांच्या पाहणीत २३ मोरांमध्ये आम्हाला तीन वर्षांपेक्षा कमी वय असलेला एकही मोर दिसला नाही. यामुळे त्यांच्या दाव्याला बळ येते. मॉर्निंग वॉक करणाऱ्या सर्वांचाच या पक्ष्यांना त्रास होतो, असे नाही. त्यातील काही माणसेच आपली वाट वाकडी करताना दिसतात. कोणाला झाडावरचा आंबा खायचा असतो, तर कोणाला जांभळे तोडण्याची घाई असते. हे करीत असताना समोर मोराचे नृत्य सुरू आहे, याचे साधे भानही त्याला राहत नाही. दोन तासांच्या पाहणीत आम्हाला असा वाकडी वाट करणारा एक प्राध्यापक भेटला. सात ते आठ मोरांचा रस्ता मोडून त्याने आंबे काढले. किमान २० गुन्ह्यांत हवा असलेला अट्टल चोरटा सदरा अर्धवट काढून आंब्यावर ताव मारताना दिसला. ज्या झुडपात मोर अंडी घालतात, तेथून तो मनसोक्त फिरत होता. जशी ही रिकामटेकडी माणसे भेटली तशी भटकी कुत्रीही भेटली. काही महिन्यांपूर्वी अशाच कुत्र्यांनी दोन मोरांना संपविले. मोरांची अंडी किती संपवली असतील, हे सांगणारी यंत्रणा या बागेकडे किंवा येथे अभ्यास करणाऱ्या पक्षीतज्ज्ञांकडे नाही. या बागेत आणखी काही वर्षे असेच मुक्त वातावरण राहिले, तर दिसणारे दोन-चार मोरही भविष्यात आढळणार नाहीत, अशी भीती व्यक्त होेत आहे.
धोका फक्त मोरांनाच नाही...
बागेतील झाडांची कटाई, माणसांना अति स्वातंत्र्य यामुळे फक्त मोर कमी होत आहेत, असे नाही. यासह इतर पक्ष्यांवरही याचा विपरीत परिणाम होत आहे. आधी मोठ्या संख्येने दिसणारा गरुड आता रोडावला आहे. स्वर्गीय नर्तक, चंडोल या पक्ष्यांचीही संख्या कमी झाली असल्याचे पक्षीतज्ज्ञ अरविंद पुजारी यांनी सांगितले. १९७६ पासून ते हिमायत बागेतील पक्ष्यांचा अभ्यास करतात.
कुठलाच शास्त्रीय अभ्यास नाही
या बागेत किती प्रकारचे पक्षी आढळतात, याची माहिती मिळते; पण ते किती आढळतात याचा अभ्यास कोणीच केला नाही. एवढे पक्षी आधी दिसायचे आता दिसत नाहीत किंवा कमी दिसतात, असे पक्षीतज्ज्ञांकडून सांगितले जाते. मोरांच्या बाबतीतही हेच; पण त्यांची नेमकी संख्या कुणाकडे उपलब्ध नाही. भविष्यात ही बाग आणि त्यातील पक्ष्यांना वाचवायचे असेल, तर अशा शास्त्रीय अभ्यासाची गरज आहे.