काँग्रेस कार्यकर्त्यांना धीर देण्याची गरज
By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T01:19:11+5:302014-06-14T01:20:18+5:30
सुरेश चव्हाण, कन्नड नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने याच मतदारसंघातील उमेदवार देऊन महायुतीला रोखण्याचा प्रयत्न केला;

काँग्रेस कार्यकर्त्यांना धीर देण्याची गरज
सुरेश चव्हाण, कन्नड
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने याच मतदारसंघातील उमेदवार देऊन महायुतीला रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र स्थानिक उमेदवारापेक्षा महायुतीच्या उमेदवाराला या मतदारसंघातून ४१ हजार ९९ मतांचे मताधिक्य मिळाले.
महायुतीला मिळालेल्या मताधिक्याने मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते हादरले आहेत. या कार्यकर्त्यांना धीर देण्याचे आव्हान पक्षाच्या पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांसमोर आहे. कन्नड तालुका आणि सोयगाव तालुक्यातील २९ गावे मिळून हा मतदारसंघ तयार झालेला आहे. भौगोलिकदृष्ट्या या मतदारसंघात काळीभुई, घाटमाथा आणि खान्देशपट्टी अशा भागांचा समावेश आहे. हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी अनुकूल समजला जात असे; मात्र आता या तालुक्याचे समीकरण बदलले आहे. मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसला पराभव पत्करावा लागला.
विधानसभा निवडणूक लढवून एकदाचे आमदार व्हायचेच, या ईर्षेने राजकारणात उतरलेले उदयसिंग राजपूत तिसऱ्यांदा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. सध्या ते राष्ट्रवादीत आहेत; आणि हा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने काँग्रेस-राकाँ आघाडी झाल्यास ते पक्षाला सोडचिठ्ठी देतील व अपक्ष निवडणूक लढवतील, असे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. त्यांच्या पत्नी पूनमताई राजपूत या राकाँ पक्षाकडून जि.प. सदस्या आहेत. त्यामुळे उदयसिंग राजपूत यांना राकाँतून बाहेर पडणे इतके सोपे नाही. मात्र निवडणूक लढविण्याचा त्यांचा निर्धार पक्का असल्याचे सांगितले जाते.
लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत वेगवेगळे मुद्दे मतदारांसमोर मांडले जातात. ऐनवेळी राजकारण कसे फिरेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सध्यातरी परिस्थितीबाबत अंदाज बांधणे कठीण आहे.
काँग्रेसची अवस्था
सन २००४ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून नामदेव पवार यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करण्यात ते कमी पडले. सन २००९ साली हर्षवर्धन जाधव यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजयश्री खेचून आणली.
सद्य:स्थितीत काँग्रेसकडून माजी आमदार नामदेव पवार, नितीन पाटील, अनिल पाटील सोनवणे, अशोक मगर हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
या निवडणुकीत काँग्रेसचे भरत राजपूत पराभूत झाले होते. गतवर्षी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला, तर माजी आमदार नामदेव पवार यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
शिवसेनेची बाजू भक्कम
मनसेकडून निवडून आलेले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
आमदार जाधव यांच्याकडे त्यांच्या हक्काची सुमारे २५ ते ३० हजार मते आहेत. त्यामध्ये शिवसैनिकांच्या मतांची भर पडणार आहे. याशिवाय गेल्या पाच वर्षांत त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये विकासकामे केल्याने त्यांची बाजू भक्कम झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत
चंद्रकांत खैरे यांना ४१0९९ मताधिक्य