जालना : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज या महामानवांनी तमाम बहुजन समाजाच्या परिवर्तनासाठी चळवळ करून प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध लढा दिला. मात्र हिंदुत्वाच्या जोखडात सापडलेला बहुजन समाजही त्याच रूढी, परंपरेत अडकलेला आहे. त्यामुळे महापुरूषांना अभिपे्रत असा समाज अद्यापही निर्माण झालेला नाही. सामााजिक परिवर्तनासाठी बहुजन समाजाने एकोप्याने चळवळ करण्याची गरज असल्याचे ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते अॅड. बी. एम. साळवे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला बोलताना सांगितले. आपण १९५८ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालयात अकरावीत प्रवेश घेतला. शिक्षणाबरोबरच समाज जागृतीसाठी विविध कार्यक्रमांतून चळवळीशी संबंध आला. पँथरच्या माध्यमातून शिष्यवृत्ती आंदोलनासह विविध आंदोलनात सहभाग नोंदविला. पुढे १९८३ पासून अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत भारिप संघटनेशी जोडलो गेलो. त्या माध्यमातून अनेक चळवळी उभ्या केल्या भूमीहीनांसाठी गायरान जमिनी देण्यासाठी चळवळ उभी करून त्या माध्यमातून अनेक भूमीहीन हे जमीनदार झाले. हा लढा अजूनही सुरूच असल्याचे सांगून ते म्हणाले की, आज दलित, बहुजन समाज हा विखूरला गेला आहे.त्यामुळे सामाजिक चळवळीला मरगळ आल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. स्वार्थ आडवा आल्यामुळेच रिपब्लिकनमध्ये गट-तट निर्माण झाले.त्याचा इतर पक्ष हे आपल्या फायदा घेत आहे. डॉ. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला जगण्याचे बळ दिले. आज वाचन संस्कृती गायब झाली. टीव्ही, मोबाईल मध्येच तरूण तासन्तास गुंतून राहतोय. वाचन नसल्याने तरूण दिशाहीन झाले आहेत. कोणतेही धोरण ठरवित नाहीत. तरूणांनी डॉ. आंबेडकरांच्या शिका, संघटित व्हा व संघर्ष करा या त्रिसूत्रांचा अंमल करण्याचे आवाहन त्यांनी केले. शब्दांकन- गंगाराम आढाव
सामाजिक परिवर्तनासाठी बहुजन समाजाने एकोप्याने चळवळ पुढे नेण्याची गरज
By admin | Updated: April 14, 2016 00:58 IST