‘डीसीसी’साठी सर्वपक्षीयांच्या पाठपुराव्याची गरज
By Admin | Updated: November 16, 2014 00:36 IST2014-11-16T00:30:24+5:302014-11-16T00:36:41+5:30
उस्मानाबाद : बँकींग परवाना नसलेल्या देशातील २९ जिल्हा बँकांना केंद्र शासनाने अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे़ उस्मानाबाद जिल्हा बँकेलाही राज्य,

‘डीसीसी’साठी सर्वपक्षीयांच्या पाठपुराव्याची गरज
उस्मानाबाद : बँकींग परवाना नसलेल्या देशातील २९ जिल्हा बँकांना केंद्र शासनाने अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे़ उस्मानाबाद जिल्हा बँकेलाही राज्य, केंद्र शासनाकडून मदत मिळण्यासाठी सर्वपक्षीयांच्या पाठपुराव्याची गरज आहे़ यासाठी आपण काही दिवसातच सहकार मंत्र्यांशी चर्चा करणार असून, लवकरात लवकर बँकेला पैसे मिळावेत, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ़ राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले़
उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह संचालकांच्या प्रयत्नामुळे बँकींग परवाना मिळाला आहे़ बँकेचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी निधी कमी पडत आहे़ बँकेला पैसे मिळावेत यासाठी शासनाकडे २१़७२ कोटी कर्ज, भागभांडवलातील २५ कोटी व इतर ५० कोटी कर्ज अशा स्वरूपात पैशाची मागणी केली आहे़ जिल्हा परिषदेने आपली खाती राष्ट्रीयकृत बँकेत टाकल्यानेही बँकेच्या व्यवहाराला अडचणी येत आहेत़ जिल्हा परिषदेचे जवळपास १०० कोटी रूपये सेव्हींग खात्यावर आहेत़ जिल्हा परिषदेचे खाते पूर्ववत डीसीसी बँकेत सुरू व्हावे, यासाठीही प्रयत्न करण्याची गरज आहे़ डीसीसी बँकेला भागभांडवलाचे १२४ कोटी, थकहमीचे ९८ कोटी असे विविध प्रकारचा निधी येणे आहे़ तो निधी मिळावा, यासाठीही प्रयत्न आवश्यक आहेत़ जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सद्यस्थितीत जवळपास ५० कोटी रूपयांची आवश्यकता आहे़ हा निधी मिळावा, म्हणून सर्वपक्षीयांनी राजकारण बाजूला ठेवून प्रयत्न करण्याची गरज आहे़ शासनाने बँकेला अर्थसहाय्य केल्यानंतर बँकेच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवून माहिती घ्यावी, असेही ते यावेळी म्हणाले़ जिल्हा बँकेच्या एकूण १०१ शाखा आणि एक्सटेंशन व मुख्य शाखा याद्वारे ६ लाख सभासदांचे आर्थिक व्यवहार चालतात़ शेतकरी, सर्वसामान्यांची आर्थिक हेळसांड थांबविण्यासाठी डीसीसीचे आर्थिक व्यवहार सुरळीत होण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले़
राज्य शासनाच्या मंत्रीमंडळ बैठकीत उस्मानाबाद जिल्हा बँकेला आर्थिक मदत मिळविण्याबाबतचा मुद्दा आणला गेलेला नाही़ त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात आला नसल्याने जिल्हा बँकेला आघाडी शासनाच्या काळात मदत मिळाली नसल्याचे आ़ पाटील यावेळी म्हणाले़
केंद्र शासनाने बँकींग परवाना नसलेल्या देशातील २९ बँकांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे़ तर उस्मानाबाद जिल्हा बँकेला अधिकारी, कर्मचाऱ्यांसह संचालकांच्या प्रयत्नामुळे बँकींग परवाना मिळाला आहे़ बँकेकडे बँकींग परवाना नसता तर या यादीत उस्मानाबाद जिल्हा बँकेचाही समावेश झाला असता़ असे चित्र असले तरी त्यावेळी रिझर्व्ह बँकेने बँकींग परवाना मिळविण्याची अट सक्तीची केल्याने चांगली कामगिरी करून बँकींग परवाना मिळविण्यात आला़ मात्र, केंद्र शासनाचा हा निर्णय बँकींग परवाना मिळविण्यासाठी चांगले प्रयत्न करणाऱ्या सर्वांनाच निराशा आणणारा असल्याची चर्चा सुरू होती़