‘मुन्नाभार्इं’चा रुग्णांच्या आरोग्याशी खेळ !
By Admin | Updated: January 19, 2015 00:58 IST2015-01-19T00:33:50+5:302015-01-19T00:58:02+5:30
संजय तिपाले , बीड ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटात अभिनेता संजय दत्त याने पात्रता नसतानाही डॉक्टर होण्याची भन्नाट भूमिका साकारली आहे.

‘मुन्नाभार्इं’चा रुग्णांच्या आरोग्याशी खेळ !
संजय तिपाले , बीड
‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटात अभिनेता संजय दत्त याने पात्रता नसतानाही डॉक्टर होण्याची भन्नाट भूमिका साकारली आहे. बीड जिल्ह्यात तर प्रत्यक्षात असे मुन्नाभाई ठिकठिकाणी अवतरले आहेत. खेडोपाड्यात त्यांनी दवाखान्यांच्या नावाखाली दुकानदाऱ्या सुरु करुन रुग्णांच्या जिवाशी अक्षरश: खेळ मांडला आहे. बोगस डॉक्टरांना पकडण्यासाठी नेमलल्या पथकांची ‘मात्रा’ काही लागू पडलीच नाही.
जिल्ह्यात २००० ते २०१४ या काळात ४६ बोगस डॉक्टरांविरुद्ध फिर्याद नोंद झाली. त्यावरुन बोगस डॉक्टर किती फोफावले आहेत? हे स्पष्ट होते. राज्यात आरोग्यसेवेसाठी चार कौन्सिलची निर्मिती केलेली आहे. अॅलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, डेन्टिस्ट या कौन्सिलचा समावेश आहे. नोंदणी केलेल्या डॉक्टरांनाच खासगी दवाखाने सुरु करुन वैद्यकीय सेवा देता येतात. मात्र, काही जणांनी वैद्यकीय व्यवसाय करण्याचा अधिकृत परवाना नसतानाही दवाखाने थाटली आहेत. अशा बोगस डॉक्टरांकडून अघोरी उपचार होण्याची शक्यताही नाकरता येत नाही. त्यामुळे विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाया करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बोगस डॉक्टरविरोधी पथके स्थापन केली. जिल्हास्तरावर तसेच तालुकापातळीवर स्थापन केलेल्या या पथकांनी केवळ २०१२ मध्ये कारवायांचा सपाटा लावला होता. त्याआधी व नंतरच्या दोन वर्षात पथकाने कारवाया कमी अन् केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम केल्याचे निष्पन्न झाले आहे. पथके थंडगार असल्याने बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर जीवघेणी ‘प्रॅक्टिस’ सुरु आहे.
वर्षनिहाय पकडलेले बोगस डॉक्टर
२००० (३), २००१ (१), २००२ (४), २००३ (४), २००४ (३), २००५ (०) २००६ (५), २००७ (१), २००८ (१), २००९ (१), २०१० (२), २०११ (४), २०१२ (१४), २०१३ (३), २०१४ (०), २०१५ (०) (कंसातील आकडे बोगस डॉक्टरांचे)
शोधमोहीम राबवू
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे म्हणाले, बोगस डॉक्टरांविरुद्ध तक्रार आल्यावर संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी कारवाया करतात. पकडलेल्या बोगस डॉक्टरने पुन्हा व्यवसाय करु नये, यासाठी आता कारवाई करतानाच ठोस पुरावे गोळा करण्यात येतील. शिवाय शोध मोहीम राबवून बंदोबस्त करण्यात येईल.