उड्डाणपूलांची जबाबदारी महापालिका किंवा बांधकाम विभागाने घ्यावी : भागवत कराड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 19:27 IST2022-01-06T19:25:12+5:302022-01-06T19:27:02+5:30
Bhagwat Karad : स्ट्रक्चरल ऑडिटनंतरच क्रांती चौक उड्डाणपूलावर फट कशामुळे पडली हे समोर येणार आहे.

उड्डाणपूलांची जबाबदारी महापालिका किंवा बांधकाम विभागाने घ्यावी : भागवत कराड
औरंगाबाद : जालना रोडवरील उड्डाणपूलांची दुरुस्तीसाठी कोणतीही यंत्रणा जबाबदारी घेण्यास तयार नसल्याचे गुरुवारी समोर आले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत क्रांती चौक उड्डाण पुलावर पडलेल्या फटीची पाहणी करून वाहतुकीस पूल धोकादायक झाला आहे की नाही, याची खातरजमा करून घेतली.
पुलातील रबर सरकल्याने फट दिसत असल्याचे एनएचएआय, मनपा, एमएसआरडीसीच्या अभियंत्यांनी राज्यमंत्र्यांना सांगितले. परंतु, स्थापत्य तंत्रानुसार ती फट काही ठिकाणी जास्त, तर काही ठिकाणी कमी आहे. त्यामुळे नेमका काय प्रकार आहे, हे आता स्ट्रक्चरल ऑडिटनंतरच समोर येणार आहे.
मनपा किंवा बांधकाम विभागाने जबाबदारी घ्यावी
दरम्यान, पाहणीनंतर एनएचएआयचे प्रकल्प संचालक अरविंद काळे, बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता पी. आर. सोनवणे, मनपाचे शहर अभियंता एस. डी. पानझडे, एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता बी. पी. साळुंखे, सुरेख अभंग, पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उड्डाणपुलांची जबाबदारी मनपा किंवा बांधकाम विभागाने घेतली पाहिजे, असे राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले.