एमएसआरडीसी शहरातून बाहेर...
By Admin | Updated: June 9, 2016 23:52 IST2016-06-09T23:46:01+5:302016-06-09T23:52:56+5:30
विकास राऊत, औरंगाबाद महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) शहरातील काम आता जवळपास संपले आहे.

एमएसआरडीसी शहरातून बाहेर...
विकास राऊत, औरंगाबाद
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) शहरातील काम आता जवळपास संपले आहे. सिडको आणि महावीर चौक येथील उड्डाणपूल वाहतुकीला खुले झाल्यानंतर महामंडळ मराठवाड्यातील प्रकल्पांवर काम करण्यासाठी सरसावणार आहे. मराठवाड्यातील ५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पावर एमएसआरडीसी काम करणार आहे. रस्त्यांच्या कामाच्या निविदा निघाल्या असून, पाहणीचे काम सुरू झाले.
शहरातील बहुतांश प्रकल्प नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे वर्ग झाल्यामुळे एमएसआरडीसीला सध्या तरी काम नाही.
जालना रोडचे सहा पदरीकरण, मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन ते जयभवानीनगर रस्ता रुंदीकरण आणि उड्डाणपूल, बीड बायपास रस्ता रुंदीकरण, औरंगाबाद ते पैठण ही कामे एनएचएआय करणार आहे. तसेच शेंद्रा ते वाळूज या रस्त्यासाठीदेखील एनएचएआयकडेच पाहणी करण्याची जबाबदारी आली आहे. जालना रोड रुंदीकरणाचे व त्यावर अंदाजे ५ उड्डाणपूल बांधणीचे काम एनएचएआय करणार असल्याचे सांगितले जात आहे. नागपूर ते मुंबई या सुपर हायवेत येणाऱ्या सहा उपनगरांच्या नियोजन प्राधिकरणाची जबाबदारी एमएसआरडीसीकडे आहे. त्या कामाला उशीर असून, ते काम औरंगाबाद शहरात मोडत नाही.
विभागातील बीड ते लातूर आणि मांजरसुंबा ते अहमदनगर, रेणापूर, आष्टी, उदगीर, मंठा ते वाटूर फाटा या रस्त्याच्या द्रुतगती रुंदीकरणाचे काम एमएसआरडीसी करणार आहे.
आता काय करणार एमएसआरडीसी? बीड, लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे रस्ते
एकात्मिक रस्ते विकास योजना २००१ साली जाहीर करण्यात आली होती. या योजनेतील कामे आजवर चालली. त्या योजनेतील भुयारी मार्ग दोन वर्षांपूर्वी रद्द करण्यात आला.
तसेच अमरप्रीत चौकातील भुयारी मार्गाचा प्रस्तावही पुढे चर्चेला आला नाही. त्यामुळे एमएसआरडीसी आता मराठवाड्यातील रस्ते रुंदीकरणाकडे वळणार आहे.
२० हजार कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून मराठवाड्यातील रस्ते विकासासाठी मिळाला आहे. त्यातील ५ हजार कोटींची कामे एमएसआरडीसीकडे वर्ग करण्यात आली. एनएचएआयकडे उर्वरित १५ हजार कोटींची कामे असतील.