डोंगर पोखरणे सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:00 IST2018-05-28T23:59:39+5:302018-05-29T00:00:23+5:30
खंडाळा परिसर : खदानीतून गौण खनिजाची विल्हेवाट

डोंगर पोखरणे सुरुच
वैजापूर : तालुक्यातील खंडाळा येथील खदानीतून मागील काही दिवसांपासून क्रशरद्वारे मोठ्या प्रमाणावर दगडाचा अनधिकृत उपसा होत असल्याने येथील टेकड्या बोडख्या झाल्याचे चित्र आहे. यातून गौण खनिजाची विल्हेवाट लावली जात असल्याने लाखो रुपयांचा शासनाचा महसूल बुडत आहे.
महसूल विभागाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
या परिसरात प्रत्येक खाणीतून रोज सरासरी ४० ते ५० ट्रक दगडांची खोदाई आणि वाहतूक सुरु असते. प्रत्यक्षात मात्र पाच किंवा दहा ट्रकचीच रॉयल्टी तिजोरीत भरली जाते. खुल्या बाजारात क्रशरधारक दहा ते पंधरा हजार रुपयांना एक ट्रक दगड, खडीची विक्री करतात. या व्यवहारामागे त्यांना सरासरी एक ट्रकला चार ते पाच हजार रुपयांची कमाई होते.खंडाळा परिसरात बऱ्याच ठिकाणी
बेकायदेशीरपणे दगडांच्या खाणी आहेत. महसूल विभागाने गेल्या वर्षी खंडाळा परिसरातील या खाणीवर कारवाई केली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
जेथे दगड संपले अशा ठिकाणी डोंगराळ भागात सर्वत्र भले मोठे खड्डेच खड्डे पडले आहेत. या व्यवसायामुळे काही वर्षात खंडाळ्यातील डोंगर नष्ट होण्याची भीती आहे.
महसूल व स्थानिक ग्रामपंचायतीचे याकडे लक्ष का जात नाही, हा मोठा प्रश्न आहे. डोंगर पोखरण्यास माफियांना सर्रास मूकसंमती येथे दिली जाते. या खाण व्यवसायात किती परवानाधारक ठेकेदार आहेत, याची तपासणी महसूल विभागाने करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सुरुंग स्फोटके येतात कोठून?
खाणीवर दगडाच्या उत्खननासाठी लागणारी सुरुंग स्फोटके कोठून येतात व ती कोठे साठवली जातात, याचा महसूल विभागाने किंवा सुरक्षा यंत्रणेने शोध घेतलेला नाही.
खंडाळा परिसरातील दगड खाणींवर स्फोटकांची आतषबाजी होत असून अनेक ठिकाणी अपघात होऊन काही जणांना जीवही गमवावा लागला आहे. दगड खाणीवर सुरुंग स्फोट करणारा कामगार हा प्रशिक्षित असावा, मात्र दगड फोडणाºया मजुरांकडून ही जोखमीची कामे करून घेतली जातात.
धुळीचे साम्राज्य
दगडखाणींमुळे परिसरातील शेतीच धोक्यात आली आहे. खंडाळा गावाजवळ तब्बल बारा स्टोन क्रेशर व पंधरा दगडांच्या खाणी आहेत. या दगडांच्या खाणींजवळ स्टोन क्रशर सुरु असतात. त्यामुळं परिसर कायम धुळीत बुडालेला असतो. धुळीमुळे पिकांवर विपरीत परिणाम होत असून पाण्याची भूजल पातळी खालावत चालली आहे. लोकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. दगडाच्या खाणी गावाच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे भूसुरुंग स्फोटात उडालेले दगड मानवी वस्तीत येऊन पडतात. अशा घटनांमध्ये अनेक गावकरी जखमी झाले आहेत. शिवाय स्फोटांच्या हादºयाने अनेक घरांच्या भिंतींना तडेही गेले आहेत.
तक्रार करुनही उपयोग नाही
याविषयी खंडाळा येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने आम्ही याविषयी जिल्हाधिकाºयांकडे लेखी तक्रार केली आहे, असे खंडाळ्याचे माजी उपसरपंच तथा ग्रा.पं.सदस्य साजीद खान यांनी सांगितले.