मोदींचा विजय माध्यमांमुळे नाही
By Admin | Updated: June 9, 2014 00:04 IST2014-06-08T23:56:28+5:302014-06-09T00:04:44+5:30
अहमदनगर : मोदींचा विजय माध्यमांमुळे झाल्याचे विश्लेषण केले जाते. मात्र, तो केवळ भ्रम आहे.

मोदींचा विजय माध्यमांमुळे नाही
अहमदनगर : मोदींचा विजय माध्यमांमुळे झाल्याचे विश्लेषण केले जाते. मात्र, तो केवळ भ्रम आहे. माध्यमांमुळे लोक मत बनवत नाहीत. माध्यमे केवळ पार्श्वभूमी तयार करण्यासाठी साह्यभूत ठरतात, असे मत माध्यम तज्ज्ञ प्रा. जयदेव डोळे यांनी मांडले.
न्यू आर्टस् महाविद्यालयात आयोजित प्राध्यापकांच्या भाषाविषयक कार्यशाळेत जनमत आणि प्रसारमाध्यमे आणि त्याची भाषा या विषयावर ते बोलत होते. काँग्रेस-राष्ट्रवादीनेही जाहिराती केल्याच होत्या. मग त्यांना का नाही यश आले. तमीळनाडू, पूर्वांचल, प.बंगालमध्येही मोदी का चालले नाही. ही उदाहरणेही त्यासाठी पुरेशी आहेत, असे विश्लेषणही डोळे यांनी केले. प्रसारमाध्यमे ही फुंकणीचे काम करतात. त्यांना कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो. ते जनता आणि नेता यांच्यातील पूल आहे, असे सांगून डोळे म्हणाले की, पत्रकार कधीच नेता घडवू शकत नाही, तसे असते तर चौकाचौकात फ्लेक लावून आणि जाहिराती देऊन नेतृत्व निर्माण झाले असते.एकवेळ बोलका नेता लवकर यशस्वी होऊ शकतो. कारण त्याला लोकांची नाळ संवाद साधल्याशिवाय समजणार नाही. वर्तमानपत्र वाचून समाजपरिवर्तन होत नाही. तसे असते तर समाजसुधारकांनी केवळ त्याव्दारेच ते घडवून आणले असते. पण तसे घडत नाही. टाटा, अंबानी, किर्लोस्कर यांनीही जनमत तयार करण्यासाठी वर्तमानपत्र काढण्याचा प्रयत्न केला. परंतु ती चालली नाहीत. जनमत घडविण्यासाठी सुरू केलेली पत्र लोकांना माहितीही नसतात, असेही ते म्हणाले़ (प्रतिनिधी)
पत्रकारांचे वाचन थांबले
पत्रकारांची साहित्यापासून नाळ तुटत चालली आहे. त्यामुळे त्यांना शब्दांचा भावार्थ कळत नाही. वाक् प्रचार, म्हणी अनावश्यक वापरल्या जातात. सध्याची भाषा नीरस बनली आहे. एकाच परिच्छेदात शब्दाची पुनरावृत्ती असते. पुनरावृत्तीही टाळली जात नाही़
‘संपन्न’, ‘सतर्क’ हे हिंदी तसेच इंग्रजी शब्दही चुकीच्या अर्थाने वापरले जात आहेत. नवीन शब्द तयार केले जात नाहीत. हे टाळण्यासाठी साहित्य वाचले पाहिजे, असेही जयदेव डोळे यांनी सांगितले़
मोदी भाजपाचे बँ्रड
भाजपाचे मोदी नावाचे ब्रँड निवडणूक बाजारात चांगले चालले. आपले मार्केटिंग कसे करावे, प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट कसा करावा हे मोदींना ठाऊक आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीचा, संसदेच्या पाया पडून इव्हेंट बनवतात. मात्र, राजकारणात अशा प्रकारची ब्रँडविक्री फार दिवस चालत नाही,असेही डोळे म्हणाले.