रांजणगावातील अतिक्रमणे वाचविण्यासाठी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:45 IST2019-05-12T23:45:38+5:302019-05-12T23:45:50+5:30
रांजणगाव शेणपुंजी येथील शासकीय गायरान व महार हडोळा जमिनीवरील अतिक्रमण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी रविवारी रांजणगावात बैठक घेण्यात आली.

रांजणगावातील अतिक्रमणे वाचविण्यासाठी बैठक
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील शासकीय गायरान व महार हडोळा जमिनीवरील अतिक्रमण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी रविवारी रांजणगावात बैठक घेण्यात आली. यात अतिक्रमणे नियमानुकुल करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन कायदेशीर बाजूने लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
रांजणगावातील येथील गायरान व महार हाडोळा जमिनीवर अनेकांनी पक्की घरे बांधली आहे. याच्या ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर ८ मध्ये नोंदीही घेण्यात आल्या असून, ग्रामपंचायत विविध करांची आकारणी करते. दरम्यान, शेख सिंकदर यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने ही अतिक्रमणे ६ महिन्यांत निष्कासित करण्याचे आदेश दिले.
ग्रामपंचायतीने आठवडाभरापूर्वी अतिक्रमणधारकांना नोटिसाही बजावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रांजणगावात आ. प्रशांत बंब यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी बैठक घेण्यात आली. यात अतिक्रमणे नियमानुकुल करण्यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे आ. बंब यांनी सांगितले.
बैठकीला सरपंच संजीवनी सदावर्ते, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, ग्रा.पं.सदस्य सुभाष सोनवणे, दत्तू हिवाळे, ज्ञानेश्वर वाघचौरे, प्रभाकर महालकर, किशोर राका, अशोक बोºहाडे, उपसरपंच अशोक शेजुळ, दीपक सदावर्ते, कांचन कावरखे आदीसह जवळपास ८०० नागरिक उपस्थित होते.